गावातील विहिरींचे पाणी क्षारयुक्त, गढूळ पाण्यासाठी नदीपात्रात उतरावे लागते तेव्हा…

| Updated on: Jul 26, 2023 | 9:08 PM

महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी थेट नदी पात्रात उतरावे लागते. असे करताना जराही तोल गेला की थेट नदी पात्रात जाण्याचा धोका कायम असतो.

गावातील विहिरींचे पाणी क्षारयुक्त, गढूळ पाण्यासाठी नदीपात्रात उतरावे लागते तेव्हा...
Follow us on

चंद्रपूर : वैनगंगा नदीपात्रालगत अनेक गावं येतात. गोसे येथे धरणाचे पाणी अडवल्याने नदीच्या दोन्ही बाजूची पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाळ्यात हेच पुराचे पाणी जीवघेणे ठरते. काही गावांतील शेतकऱ्यांची जमीन बुडते. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातो. वैनगंगा नदीच्या काठावर टोक नावाचे एक गाव आहे. या गावातील पाणी क्षारयुक्त आहे. म्हणून महिला नदीचे पाणी पिण्यासाठी आणतात. सध्या नदीचे पाणी दूषित झाले आहे. ते गढूळ झालेले पाणी नदीतून काढण्यासाठी महिलांना कसरत करावी लागते.

तोल नदीपात्रात जाण्याचा धोका

टोक गावाशेजारून वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी थेट नदी पात्रात उतरावे लागते. असे करताना जराही तोल गेला की थेट नदी पात्रात जाण्याचा धोका कायम असतो. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी करायचं काय ? हा प्रश्न गावकरी विचारत आहेत. ही विदारक स्थिती अद्यापही प्रशासनाला दिसलेली नाही. चंद्रपूर जिल्हातील पोंभुर्णा तालुक्याच्या शेवटचा टोकावर असलेलं लहानसे गाव टोक. गावात जेमतेम 30 कुटुंब. लोकसंख्या 200. सर्व परिवार केवट समाजाचे आहेत.

नदीपात्रातून आणावे लागते पिण्याचे पाणी

टोक गावातील लोकांकडे मोजकी शेतजमीन आणि मासेमारी हा गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे. गावात अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष झाले. गावाची मुख्य समस्या पिण्याच्या पाण्याची आहे. टोक गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदी पात्रातील पाणी आणावे लागते.

नदीचे गढूळ पाणी प्यावे लागते

पिण्याच्या पाण्याची ही समस्या मार्गी लागावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य वैभव पिंपळशेंडे यांनी लावून धरली. सहा महिन्यांपूर्वी जल जीवन मिशन योजने अंतर्गत सोलर ड्युअल पम्प बसाविण्यात आले. मात्र या विहिरीचे पाणी क्षारयुक्त असल्याने पाण्याचा वापर पिण्यासाठी होत नाही. अशात ऐन पावसाळ्यात त्यांना नदी पात्रातून पिण्याचे पाणी त्यांना आणावे लागते. सध्या नदीला गढूळ पाणी आहे. या गढूळ पाण्यासाठी ही गावाकऱ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.