भगरीच्या विषबाधेवर कुणी बोलणार का? पोते जप्त, काही ठिकाणी विक्री बंद, कारण काय?

| Updated on: Sep 28, 2022 | 10:03 AM

औरंगाबाद, बीड, नगर जिल्ह्यातील नागरिकांना भगरीतून विषबाधा झाल्याचं समोर आलंय.

भगरीच्या विषबाधेवर कुणी बोलणार का? पोते जप्त, काही ठिकाणी विक्री बंद, कारण काय?
बीडमध्ये अन्न व औषध विभागाची कारवाई
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दत्ता कनवटे, महेंद्र मुधोळकर-  औरंगाबाद, बीडः राज्यात शिवसेना विरोधात शिंदे सेना असा मोठा संघर्ष सुरु आहे. मात्र सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे यामुळे दुर्लक्ष होऊ नये, अशी लोकभावना आहे. सध्या राज्यभरात नवरात्रीचा (Navratri) उत्सव सर्वत्र साजरा केला जातोय. अनेक भाविक यानिमित्त उपवास करतात. या उपवासासाठी वापरण्यात आलेल्या भगरीतून (Bhagar) विविध जिल्ह्यांमध्ये विषबाधा झाल्याचं उघडकीस आलं आहे. नवरात्री आणि त्याआधीच्या आठवड्यापासून हा प्रकार घडतोय. विशेष म्हणजे एखाद्या कार्यक्रम स्थळी शिजवण्यात आलेल्या भगरीतून विषबाधा होणं, हा प्रकार यंदा घडत नाहीये. तर राज्यभरात विविध ठिकाणी मिळत असलेल्या भगरीतूनच ही विषबाधा होत असल्याचं उघडकीस येतंय. त्यामुळे सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागानं यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली जातेय. काही ठिकाणी भगरीचे अन्न व औषध प्रशासन विभागाने सील केले आहेत. पण का प्रकार नेमका का घडतोय, यामागे कुणाची चूक आहे, हेही उघड करावे, अशी मागणी केली जातेय.

बीड जिल्ह्यात नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच जवळपास 200 जणांना भगरीतून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलाय. काही जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काहीजण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

आज सकाळी पुन्हा एकदा गेवराई तालुक्यातील गुळज आणि भगवान नगर या ठिकाणी 18 जणांना भगरीतून विषबाधा झाली. त्यांना तात्काळ गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याच पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभाग ॲक्शन मोडवर आला असून मोंढा परिसरातील दोन दुकानांवर छापे टाकून अधिकाऱ्यांनी भगरीचे पोते सील केले आहेत.

सध्या भगरीचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आलेत. त्यानंतर या दुकानावर कारवाईचा इशारा अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याने दिला आहे.

औरंगाबादेत नवरात्रीच्या उपवासाला खाल्लेल्या भगरीमुळे 524 जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलंय. वैजापूर तालुक्यात ही घटना घडली.

82 किलो भगर जप्त करण्यात आली असून अन्न आणि औषधी प्रशासनाने भगरीची विक्री बंद केली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यात तालुक्यात आणि गावात भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याचं समोर आलंय.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील ग्रामस्थांनांनाही विषबाधा झाली. भगर खाल्ल्यानंतर रुग्ण अस्वस्थ झाले. त्यांच्यावर तिसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.