Ayodhay Ram Temple Donation Theft Case : प्रभू रामचंद्रांनी चोरी उघड करण्यासाठीच उद्धव ठाकरेंची निवड केलीय, शिवसेना नेत्याचा दावा
Ayodhay Ram Temple Donation Theft Case : "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राम मंदिर उभारण्यासाठी तुमचं योगदान काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांना भाजप नेते विचारू लागलेत"

अयोध्येतील राम मंदिर दान चोरीच्या मुद्यावरुन सध्या उद्धव ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. हिंदुत्व आणि राम मंदिराच्या मुद्यावरुन भाजपची कोंडी करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी सातत्याने राम मंदिराचा मुद्दा लावून धरला आहे. पत्रकार परिषदा, जाहीर सभां या माध्यमातून ते राम मंदिराच्या मुद्यावरुन भाजपला लक्ष्य करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी आणि हिंदुत्ववादी मतदार अजून दूर जाऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन सुरु केलं आहे. मुंबईत दादरमधून या आंदोलनाला मागच्या महिन्यात त्यांनी सुरुवात केली होती. रामरक्षा पठणाचा कार्यक्रम त्यानंतर जाहीर सभांमधून भाजपवर हल्लाबोल असं या आंदोलनाचा स्वरुप आहे.
उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना आपपाल्या जिल्ह्यात, तालुक्यात हे रामरक्षा आंदोलन सुरु करण्याची सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कोकणात सुहागीमध्ये विक्रांत जाधव यांच्यावर ही जबाबदारी आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून हिंदुत्व सोडल्याची सातत्याने टीका होते. भाजपने याच मुद्यावरुन त्यांना आतापर्यंत अनेकदा टार्गेट केलं आहे. रामरक्षा आंदोलनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे पक्षाचा हिंदुत्ववादी चेहरा अधिक प्रखर करण्याचा आणि पक्षापासून दुरावलेल्या हिंदुत्ववादी मतदाराला पुन्हा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न आहे.
बाबरी मशीद पाडली तेव्हा हिंदू समाजाच्या मागे कोण उभं राहिलं
“बाबरी मशीद पाडली तेव्हा हिंदू समाजाच्या मागे कोण उभं राहिलं, ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राम मंदिर उभारण्यासाठी तुमचं योगदान काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांना भाजप नेते विचारू लागलेत” अशी टीका ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी केली. उद्धव ठाकरे यांची झालेली निवड ही प्रभू रामचंद्रांनी चोरी उघड करण्यासाठी केली आहे, असा दावा विक्रांत जाधव यांनी गुहागरमधील पत्रकार परिषदेत केला. गुहागर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी प्रभू रामांच्या आणि हनुमानाच्या मंदिरामध्ये आरत्या करण्याचा नियोजन ठाकरे गटाकडून करण्यात आल्याची माहिती आहे. विक्रांत जाधव यांनी माध्यमांना ही माहिती दिली. विक्रांत जाधव हे भास्कर जाधव यांचे पुत्र आहेत.