‘मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की….’; प्रकाश आंबेडकरांचे पंतप्रधान मोदींना पत्र

प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांगलादेशातील बौद्ध आणि चकमा समुदायांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत पत्र लिहिले आहे. त्यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेसाठी तात्काळ पावले उचलण्याची विनंती केली आहे.

मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की....; प्रकाश आंबेडकरांचे पंतप्रधान मोदींना पत्र
प्रकाश आंबेडकरांचे पंतप्रधान मोदींना पत्र
Chetan Patil | Updated on: Jan 12, 2025 | 8:40 PM

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये बांगलादेशातील बौद्ध आणि चकमा यांच्या कठीण परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता, बांगलादेशातील सर्व अल्पसंख्याक समुदायांच्या, विशेषतः बौद्ध आणि चकमांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित आवश्यक पावले उचलावीत, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. “प्रिय पंतप्रधान मोदी, बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याक आणि आदिवासी लोकांविरुद्ध, विशेषतः बौद्ध आणि चकमा यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल मी तुम्हाला लिहित आहे. बांगलादेशातील हिंदूवरील हिंसाचाराच्या समर्थनार्थ आणि निषेधार्थ भारत सरकारने घेतलेली भूमिका कौतुकास्पद आणि स्वागतार्ह आहे. पण, बौद्ध आणि चकमा या अल्पसंख्याक समुदायाविषयी भूमिका घेण्यात आली नाही”, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

“बांगलादेशात बौद्ध आणि चकमांना तोंड द्यावे लागत असलेल्या हिंसाचार आणि भेदभावाबद्दल मला खूप चिंता आहे. ज्यांच्या मदतीसाठी आणि हस्तक्षेपासाठीच्या विनंतीकडे भारत सरकार आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे”, असं प्रकाश आंबेडकर पत्रात म्हणाले आहेत.

‘बांगलादेशात चकमा गटांवर हल्ले’

“बांगलादेशच्या माजी पंतप्रधान श्रीमती शेख हसीना यांना त्यांच्या पदावरून अनैतिकरित्या काढून टाकल्यापासून, मी बौद्धांवरील हल्ले, त्यांच्या धार्मिक स्थळांची तोडफोड, बांगलादेशातील त्यांच्या मालमत्तेची तोडफोड आणि चितगाव डोंगराळ भागात स्थानिक चकमा गटांवर हल्ले आणि त्यांची दुकाने, घरे जाळणे यासारख्या त्रासदायक घटना पाहिल्या आहेत”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

‘मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की….’

“बांगलादेशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे अल्पसंख्याक असलेल्या बौद्धांवर सुरू असलेले हल्ले हे २०१२च्या रामू हिंसाचाराचे प्रतिध्वनी आहेत. बांगलादेशातील बौद्ध आणि चकमा यांच्या कठीण परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता, मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की, बांगलादेशातील सर्व अल्पसंख्याक समुदायांच्या, विशेषतः बौद्ध आणि चकमांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित आवश्यक पावले उचलावीत”, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us