Nashik| इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही…पांढरपट्टे यांच्या गझल सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

| Updated on: Dec 04, 2021 | 3:42 PM

गझलकार डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी गझल आणि कवितेतील फरक सांगितला. ते म्हणाले, एका कवितेमध्ये एकाच विषयाचा समावेश असतो, तसे गझलमधील प्रत्येक शेर हा वेगळा असतो.

Nashik| इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही...पांढरपट्टे यांच्या गझल सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध
नाशिक साहित्य संमेलनात गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे सादरीकरण रंगले.
Follow us on

कुसुमाग्रजनगरी, नाशिकः

उडवाच मान माझी,
माझा नकार नाही…
इतकीच शर्त आहे,
मी वाकणार नाही…

अशी भावपूर्ण गझल गझलकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी साहित्य संमेलनातील गझल कट्ट्यावर सादर केली आणि उपस्थित मंत्रमुग्ध केले. जीवनातील प्रत्येक प्रसंग व विषय गझलेच्या माध्यमातून व्यक्त करता येतो. त्यामुळे गझल ही एक जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी भाषा आहे, हे सांगायलाही यावेळी डॉ. पांढरपट्टे विसरले नाहीत.

गझल आणि कविता…

गझलकार डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी गझल आणि कवितेतील फरक सांगितला. ते म्हणाले, एका कवितेमध्ये एकाच विषयाचा समावेश असतो, तसे गझलमधील प्रत्येक शेर हा वेगळा असतो. रसिकांना समजेल अशा सोप्या व सरळ भाषेत गझल असावी. गझलची निर्मिती ही उर्दू भाषेमध्ये झाली असली तरी मराठी भाषेतील गझलचा प्रवास सुरेश भट यांनी सुरू केला. सुरेश भट यांच्यासोबत पत्रामार्फत झालेला पहिला संवाद, ‘तुला जर चांगले मार्गदर्शन मिळाले तर तू एक उत्तम गझलकार होशील. तुझा चाहता -सुरेश भट’ हा अनुभव देखील डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी कथन केला. सुरेश भट यांनी समोरच्या साहित्यिकातील क्षमता ओळखून त्यांना लिहिण्यासाठी मार्गदर्शन केले आहे, असेही गझलकार डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी उडवाच मान माझी, माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही…ही गझल सादर केली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. गझलमंचच्या उद्घाटनानंतर डॉ. पांढरपट्टे यांनी अभिजात मराठी भाषा दालनास भेट दिली. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत महामहीम राष्ट्रपती यांना देण्यात येणारे पत्र ही त्यांनी टपाल पेटीत टाकले.

सौंदर्याची अभिव्यक्ती

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक सुनील कडासने म्हणाले, समृद्ध व सुदृढ समाज घडविण्यासाठी संत साहित्याच्या माध्यमातून तयार झालेला भक्ती संप्रदाय प्रेरक ठरत आहे. जगामध्ये भारत असा एकमेव देश आहे, ज्याने सर्व धर्मांचा व त्यांच्या सांस्कृतीचा स्वीकार केला. हे उर्दू गझलच्या रुपाने अनुभवास मिळते. सौंदर्याची अभिव्यक्ती म्हणजे गझल आहे. यावेळी त्यांनीही आपली गझल रसिकांसमोर सादर केली. कमलाकर आबा देसले, खलील मोमीन व अरूण सोनवणे यांनी सादर केलेल्या गझलांना रसिकांनी दाद दिली. कार्यक्रमाला संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले, संमेलन समन्वयक समीर भुजबळ, निमंत्रक व प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, संमेलनाच्या सर्व समित्यांचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर, विनायक रानडे, कवी नरेश महाजन, गझलकार कमलाकर आबा देसले, खलील मोमीन, अरुण सोनवणे यांच्यासह रसिक प्रक्षेक उपस्थित होते.

इतर बातम्याः

Nashik Sahitya Sammelan ‘ऐसी अक्षरे’मध्ये पालवांची कॅलिओग्राफी रंगली…!

Nashik| मी या भाषेत फडफडत राहीन, कोलटकरच्या भिजक्या वहीवरचं कासव कवेत घेईन; अन् अख्खे कविसंमेलन भारावले…!