ताप आल्याने गोळ्या खाल्ल्या अन्… पुढील क्षणात विपरीत घडलं; जेजुरी अपघाताबाबत हादरवणारी माहिती समोर
pune jejuri accident : पुण्याच्या जेजुरीत भीषण अपघाताची घटना घडली. या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुण्यातील जेजुरी-सासवड रस्त्यावर भीषण अपघातात 3 वारकऱ्यांचा मृत्यू झाला. ट्रक दिंडीला धडकल्याने भीषण अपघात झाला. या धडकेत 3 महिलांचा दुर्देवी मृत्यू झालाय. या अपघात प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला अटक केली आहे. अटक केल्यानंतर चौकशीत वेगळीच बाब समोर आली आहे. ताप आल्याने चालकाने अधिक प्रमाणात औषध घेतल्याची बाब समोर आली आहे. पोलीस अपघाताच्या सर्व पैलूंचा सखोल तपास करत आहे.
जेजुरीत अपघातग्रस्त नागरिकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या जेजुरीमधील खासगी रुग्णालयात सहा जणांवर उपचार सुरू आहेत. या अपघातात एक जण गंभीर जखमी आहे. तर त्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आलं आहे. जखमींची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी भेट घेतली.
जेजुरीमधील अपघातात मृत्यू पावलेल्या महिलांची नावे समोर आली आहे. नंदा पवार, माधवी सलगरे, राजश्री भोसले असे मृत महिलांची नावे आहेत. या महिलांच्या मृत्यूमुळे सांगलीत शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच सांगलीच्या कसबे डिग्रज गावात बंद पाळण्यात आला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ काय म्हणाले?
पुणे जिल्हा परिषद सीईओ गजानन पाटील यांनी या दुर्घटनेवर भाष्य केलं. गजानन पाटील म्हणाले, ‘अपघातातील जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे. तर दोन गंभीर जखमी वारकऱ्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आलीये. अपघातामागची कारणं आता शोधली जाणार आहेत. प्रथम जखमींवर उपचार करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेचे आरोग्य यंत्रणा तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत’.
पोलीस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती
पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल म्हणाले, ‘ हा ट्रक नांदेडचा आहे. या ट्रकचा चालक हा 65-70 वर्षांचा आहे. बालाजी डग असे त्याचे नाव आहे. ताप आल्याने त्याने गोळ्या घेतल्या. झोप लागल्याने हा अपघात झाला. जखमींवर उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वारकऱ्यांना आवाहन आहे की, आपल्या दिंडीसोबतच चला. आपल्या लेनवर चाला. चालक फिट असला पाहिजे. आमच्या जबाबदाऱ्या अजून चांगल्या प्रकारे पार पाडू. काही वाहन देखील दुरुस्त नाहीत. आपल्याला जो मार्ग दिला आहे, त्यावरच चाला’.