जनतेच्या मनातील मुख्यमंत्री… अजित पवार यांचे पुण्यात बॅनर; पुन्हा राजकीय चर्चांना उधाण

अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांचा धुरळा बसत नाही तोच आता नव्याने चर्चांना उधाण आलं आहे. कोथरूडमध्ये लागलेल्या बॅनर्समुळे या चर्चांना उधाण आलं आहे. या बॅनर्समुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री... अजित पवार यांचे पुण्यात बॅनर; पुन्हा राजकीय चर्चांना उधाण
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 22, 2023 | 8:12 AM

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजप सोबत जाण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. अजितदादांनीही या चर्चांना पूर्णविराम दिल्या. मात्र, तरीही अजितदादा भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा काही थांबता थांबत नाहीत. आता या चर्चा सुरू असतानाच त्यात आणखी एका घटनेने भर घातली आहे. अजितदादा हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स पुण्यात झळकले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये हे बॅनर्स झळकल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अजित पवार यांनी काल एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं होतं. त्यानंतर संध्याकाळी अचानक कोथरूडमध्ये अजितदादांचे बॅनर्स लागले. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं या बॅनर्सवर लिहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार… असंही बॅनर्सवर लिहिलं आहे. या बॅनर्सवर अजितदादा पवार यांचा भला मोठा फोटो आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले आहेत. दिपाली संतोष डोख यांनी हे बॅनर्स लावले असून त्यावर त्यांचं आणि फोटोही आहेत. कोथरूडमध्ये अचानक अजित पवार यांचे बॅनर्स लागल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवार यांनी काल एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं होतं. तसेच राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं आकर्षण नाही. पण मख्यमंत्रीपदाची दावा ठेवण्याची आताही तयारी आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं होतं. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीच्या प्रश्नावर भाष्य करण्यास नकार दिला. ज्या गोष्टीला साडेतीन वर्ष झाली. त्यावर मला भाष्य करायचं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, मुख्यमंत्री पदावर आमचा अजूनही दावा असल्याचं सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबेही त्यांनी जाहीर केलं.

दहा दिवसात काय घडलं?

गेल्या दहा दिवसांपासून राज्याचं राजकारण अजित पवार यांच्या भोवती फिरत आहे. अजित पवार आधी नॉट रिचेबल झाल्याने तर्कांना उधाण आलं होतं. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याचा दावा केला. त्यामुळे अजितदादा हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं. अजित पवार यांनीही या अफवा असल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला होता.

Follow Us