प्रभाग पद्धतीवर आघाडीत मतभेद, अजितदादांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; वाद वाढणार की मिटणार?

| Updated on: Sep 24, 2021 | 6:55 PM

राज्य सरकारने मुंबई वगळता इतर महापालिकेत तीन प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला काँग्रेससह आघाडीतील काही मंत्र्यांनी विरोध केला आहे. (ajit pawar reaction on multi-member wards in urban civic bodies)

प्रभाग पद्धतीवर आघाडीत मतभेद, अजितदादांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; वाद वाढणार की मिटणार?
पालकांनो, तुमचा मुलगा, मुलगी काय करते याकडे लक्ष द्या; अजितदादांचं नेमकं आवाहन काय?
Follow us on

पुणे: राज्य सरकारने मुंबई वगळता इतर महापालिकेत तीन प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला काँग्रेससह आघाडीतील काही मंत्र्यांनी विरोध केला आहे. या प्रभाग पद्धतीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही विरोध असल्याची चर्चा होती. त्यावर अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वॉर्ड रचनेबाबत आघाडीत वाद होणार नाही. काही काळजी करू नका, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. (ajit pawar reaction on multi-member wards in urban civic bodies)

अजित पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. वॉर्ड रचनेबद्दल वाद होणार नाही. काही काळजी करू नका. ज्यांना कोर्टात जायचे ते जाऊ शकतात. यावर येत्या बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल. कारण आमच्या काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतलीय, असं सांगतानाच पण असल्या विषयात मला रस नाही. मला विकास कामाच्या बाबतीत काय विचारायचे ते विचारा, असले प्रश्न विचारू नका, असं पवार यांनी सांगितलं.

राज ठाकरेंना काय म्हणायचं ते म्हणू द्या

सत्ता काबीज करण्यासाठीच प्रभाग रचना बदलण्यात आल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. त्यावर अजितदादांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर राज ठाकरेंना काय म्हणायचं ते म्हणू द्या, असं सांगून त्यांनी अधिक बोलणं टाळलं.

आयोग त्यांची भूमिका घेऊ शकते

निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलण्यास नकार दिल्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर पवार यांनी मोजकीच प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोग त्यांचं काम करतंय. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात, असं त्यांनी सांगितलं.

सोमय्यांबाबत चुकीचं घडलं

यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांशी पोलिसांनी केलेल्या व्यवहारावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. किरीट सोमय्या यांच्याबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचं घडलं. कुणाला काही पाहणी करायची असेल तर ती करु द्यावी, असं अजित पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्यावरुन अजित पवार यांच्यावरही आरोप केले आहेत. त्याबाबत विचारलं असता, कुणी माझं नाव घेत असेल तर त्याला मी काय करु. त्यांनी पुण्यात येऊन माझं नाव घेऊ द्या किंवा काटेवाडीत येऊन घेऊ द्या. मला त्यावर काही म्हणायचं नाही, असं ते म्हणाले.

पुन्हा कुणाची हिंमत होऊ नये

राज्यातील महिला अत्याचाराबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं. त्यावेळी ‘शक्ती कायदा करत असताना आमच्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत. शिवाय त्याचा कुणाला त्रास होता कामा नये. आई-वडिलांनी आपला मुलगा आणि मुलगी काय करते याकडे लक्ष दिले पाहिजे. 70 ते 75 टक्के घटना या जवळच्या लोकांकडून घडत असतात. त्यांना एवढं कडक शासन केलं पाहिजे की ते बघितल्यावर कुणाच्या मनात तस करण्याची हिंमत झाली नाही पाहिजे’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

अशा विधानांना प्रसिद्धी देऊ नका

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत. असे 100 अजित पवार खिशात घालून फिरतात असं वक्तव्य केलं होतं. त्याबाबत विचारलं असता, मला त्यावर काही बोलायचं नाही. मी फक्त विकासावर बोलेन. तुम्ही माध्यमं तरी कशाला अशा वादग्रस्त विधानांना विनाकारण प्रसिद्धी देता. अशा वक्तव्याला प्रसिद्धी देऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं. (ajit pawar reaction on multi-member wards in urban civic bodies)

 

संबंधित बातम्या:

Breaking : झेडपी आणि पंचायत समिती पोट निवडणुका पुढे ढकलण्यास निवडणूक आयोगाची असमर्थता! आता सरकारची भूमिका काय?

Varsha Gaikwad : ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी, शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार : वर्षा गायकवाड

शाळांचं ठरलं,महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय कधी? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार, उदय सामंतांची माहिती

(ajit pawar reaction on multi-member wards in urban civic bodies)