अजित पवार सत्तेत येताच भाजपमध्येही धुसफूस, पुण्यातून मोठी बातमी समोर

| Updated on: Jul 05, 2023 | 7:20 PM

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता भाजपमध्येही धुसफूस सुरु झाल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे पुण्यात काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी याबाबत जाहीर नाराजी देखील व्यक्त केली आहे.

अजित पवार सत्तेत येताच भाजपमध्येही धुसफूस, पुण्यातून मोठी बातमी समोर
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करून आमदार अजित पवार यांच्यासह 9 आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिल्यानंतर, पुणे जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी समोर आली आहे. पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस नवनाथ पारखी यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींवर नाराजी व्यक्त करत सरचिटणीस नवनाथ पारखी यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे. नवनाथ पारखी यांचं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे.

राष्ट्रवादीसोबत युती केल्यानंतर जुन्या, निष्ठावान सामान्य भाजप कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असुरक्षितपणाची भावना असल्याचं म्हणत नवनाथ पारखी यांनी मनातली खदखद व्यक्त केली. त्यांनी पत्राद्वारे सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात असलेले 5 प्रश्न उपस्थित करत, फडणवीसांना उत्तर देण्याचं आवाहन केलं आहे.

भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस नवनाथ पारखी यांनी उपस्थित केलेले 5 प्रश्न :

1) अजित पवार आणि त्यांच्या सहयोगी यांना सत्तेत सामावून घेऊन राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढेल का भाजपची?

हे सुद्धा वाचा

2) आमच्या सारख्या हजारो कार्यकर्त्यांचे वाली आपण आहात, मग आम्हाला ताकद देणं हे आपलं काम नाही का?

3) वेळ पडेल तेव्हा जेवणाची शिदोरी सोबत घेऊन आम्ही पक्षाचा प्रचार आणि प्रसार केला आहे. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचं संघटनेत महत्त्व काय?

4) मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात निष्ठावान कारकर्त्यांची तर जिरवणार नाही ना?

5) भाजपच्या मंत्री पदाच्या शर्यतीतील सहयोगी आमदार नेत्यांचे कायं? ज्यांनी आजवर पक्षासाठी खूप काही केलंय.

महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण सध्या प्रत्येक पक्षाच्या गोटात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. अजित पवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. पण त्यांनी सत्ताधारी भाजप पक्षासोबत हातमिळवणी केली आहे. त्यांचं सत्तेत सामील होणं शिंदे गटाच्या आमदारांना आवडलेलं नाही, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांचं सत्ते येणं हे पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना देखील पटलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.