’26/11 चा बॉम्बस्फोट नाना पटोले यांनी केला’, देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं वक्तव्य

"मी नाना भाऊंचे आभार मानतो. नाना भाऊ माझा खरा मित्र आहे. नाना भाऊला माहिती आहे की, ही गोष्ट कुणाला विसरुच द्यायची नाही. लोकं विसरले की, नाना भाऊ वाझेचा विषय काढतातच. त्यामुळे मी त्यांचा मनापासून आभारी आहे", अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीसांनी केली.

26/11 चा बॉम्बस्फोट नाना पटोले यांनी केला, देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं वक्तव्य
Chetan Patil | Updated on: May 18, 2023 | 5:30 PM

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोला लगावला. फडणवीस पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. तर नाना पटोले यांच्या एका विधानावरुन त्यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली. फडणवीस यांनी जवळपास अर्धा तास भाषण केलं. त्यांचं आजचं भाषण अतिशय सडेतोड ठरलं. त्यांनी अनेक मुद्द्यांवर विरोधकांवर निशाणा साधला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक पार पडली. या बैठकीला भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

“आपण अडीच वर्ष एक सरकार बघितलं. त्या सरकारमध्ये नेमकं काय होतं? ते सरकार विश्वासघाताचं सरकार होतं. त्या सरकारचा विश्वासघातापासून विसर्जनापर्यंतचा प्रवास आपण पाहिला. आपण खंडणीखोरांपासून दाऊदपर्यंतचा संबंध असलेल्यांचा मंत्रिमंडळातला समावेश पाहिला. मंत्रिमंडळातला समावेश तर ठीकच आहे, पण मुख्यमंत्र्यांना एकूण अडीच वर्षामध्ये केवळ काही तास मंत्रालयामध्ये बघितलं. आपण मोठ्या लोकांची गळचेपी होताना बघितलं. पोलिसांच्या बदल्यांमध्ये वसुलीचं कांडदेखील बघितलं”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“नरेटिव्ह कसं, संजय राऊतांना बेल मिळाला तर लोकशाहीचा विजय आणि नवाब मलिकांना बेल मिळाली नाही तर लोकशाहीची हत्या, अशाप्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न बघितल. पण आपण आता अशा कोणत्याही प्रयत्नाला बळी पडायचं नाहीय”, असं आवाहन फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं.

नाना पटोले यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले?

“मला तर फार मजा आली, आमचे नाना पटोले, काल-परवा, त्यांना तर अवॉर्डच दिला पाहिजे, ते म्हणाले की, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरचे स्फोटके मीच ठेवले. आता मला इच्छा झाली की, आपणही एक स्टेटमेंट द्यावं, 26/11 चा बॉम्बस्फोट नाना पटोले यांनीच केला”, अशी मिश्किल टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

फडणवीसांना ‘तो’ किस्सा सांगितला

“माझा एक सवाल आहे, सचिन वाझेला पोलीस दलात कोणी घेतलं? हा वाझे पोलीस दलात परत घेण्याकरता उद्धव ठाकरेंनी माझ्याकडे पाठवला. माझ्यावर दबाव आणला. त्यांचे मंत्री माझ्याकडे आले. सांगितलं की, साहेबांचा आग्रह आहे, काहीही झालं तरी वाझेला तुम्ही पोलीस दलात परत घ्या. मी म्हटलं, अशा माणसाला मी पोलीस दलात परत घेणार नाही. मी फाईलवर लिहिलं, परत घेणार नाही”, असं फडणवीसांनी सांगितलं.

“उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी पहिला निर्णय घेतला, वाझेला पोलीस दलात घेतलं. त्यानंतर वाझे कुठे असायचा? एकतर वर्षावर किंवा मातोश्रीवर. हा कुणाचा वाझे होता?”, असा सवाल फडणवीसांनी केला.

“आता परमवीर सिंहांनी तुमच्यावर आरोप केला त्यात आमची काय चूक आहे? परमवीर सिंह यांना मुंबईचा आयुक्त कोणी बनवलं? उद्धव ठाकरेंनी. त्यांनी आरोप लावल्यावर काढलं कुणी? तर उद्धव ठाकरेंनीच. सचिन वाझेला परत घेऊन वसूलीचं रॅकेट उभं केलं. त्याच्या जबानीतून आता सगळं पुढे आलं आहे”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

‘मी मन्सूख हिरेंची हत्या शोधून काढली’

“मी यांचं रॅकेट बाहेर काढलं नसतं, मन्सूख हिरेंची हत्या मी शोधून काढली नसती तर हे सगळं यांनी पचवून टाकलं असतं. पण त्यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून मन्सूख हिरेंची हत्या मी शोधून काढली आणि यांचं रॅकेट पुढे आलं. नाहीतर हे असेच हजारो कोटी रुपये वसूलीच्या माध्यमातून कमवून राहिले असते”, अशी टीका फडणवीसांनी केली.

“मी नाना भाऊंचे आभार मानतो. नाना भाऊ माझा खरा मित्र आहे. नाना भाऊला माहिती आहे की, ही गोष्ट कुणाला विसरुच द्यायची नाही. लोकं विसरले की, नाना भाऊ वाझेचा विषय काढतातच. त्यामुळे मी त्यांचा मनापासून आभारी आहे”, अशी टिप्पणी फडणवीसांनी यावेळी केली.

Follow Us