देशाच्या सीमांचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांवर निवृत्तीनंतर गावच्या विकासाची जबाबदारी, धोत्रे ग्रामस्थांचा ऐतिहासिक निर्णय

धोत्रे ग्रामस्थांनी गावची जबाबदारी देशसेवा केलेल्या माजी सैनिकांना आणि त्यांच्या पत्नींकडे दिली आहे. (Dhotre village Ex Serviceman)

देशाच्या सीमांचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांवर निवृत्तीनंतर गावच्या विकासाची जबाबदारी, धोत्रे ग्रामस्थांचा ऐतिहासिक निर्णय
धोत्रे ग्रामस्थ
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 8:02 PM

सोलापूर: जिल्ह्यातील बार्शी (Barshi) तालुक्यातील धोत्रे (Dhotre) गावातील नागरिकांनी एक मोठा आदर्श घालून दिला आहे. ग्रामस्थांनी तंटे वाद न करता गावची निवडणूक बिनविरोध केली आहे. या पुढील पाऊल टाकत धोत्रे ग्रामस्थांनी गावची जबाबदारी देशसेवा केलेल्या माजी सैनिकांना आणि त्यांच्या पत्नींकडे दिली आहे. आता धोत्रे गावचा कारभार माजी सैनिक पाहणार आहेत. (Dhotre village elect Ex Servicemen on Gram Panchayat unopposed)

बार्शी शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या धोत्रे गावाची लोकसंख्या दोन हजार आहे. गावात सर्व जाती धर्माची लोक गुण्यागोविंदाने राहतात. निवडणुका आल्या म्हणलं की पक्षीय राजकारण आलेच. त्यामुळे गट तट, आरोप-प्रत्यारोप, राजकीय वाद- विवाद या गावालाहही काही नवीन नाही. त्यामुळे आतापर्यंत या गावात एकदाही ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली नाही.

नऊ जागांसाठी नऊ अर्ज

धोत्रे गावात तीन प्रभाग असून ग्रामपंचायतीची सदस्य संख्या नऊ आहे. या गावातील मतदारांची संख्या 1313आहे. शेती हाच या गावच्या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. त्याचबरोबर या गावात मध्यम वयस्क आणि वयोवृद्ध असे 34 माजी सैनिक आहेत तर 15 जवान भारतीय सैन्य दलात सध्या कर्तव्य बजावत आहेत. यंदाची ग्रामपंचायत निवडणूक लागल्यानंतर आजवर देश सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांना गावातल्या लोकांनी बिनविरोध निवडून देऊन गावची सेवा करण्याची संधी दिली आहे.

धोत्रे गावातील नऊ जागांच्या निवडणुकीसाठी सतरा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. गावातील स्थानिक पातळीवर गटांमध्ये मनोमिलन होऊन सदस्य संख्येएवढेच अर्ज ठेवून इतर अर्ज माघारी घेण्यात आले. यामुळे गावची ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. माजी सैनिक आणि महिला जागेवर आरक्षण असलेल्या जागी त्यांच्या पत्नींना संधी देण्यात आली आहे.

बीएसएफमधून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक गणेश मोरे यांनी ग्रामस्थांनी दिलेली जबाबदारी पार पाडू असं म्हटलं आहे. आर्मीमधून 20 वर्ष सेवा करून निवृत्त झालेले मोहन नामदेव जाधवर यांनी ग्रामस्थांनी ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. गावच्या विकासासाठी कार्यरत राहू, असं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

बारामती तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत, सर्वच 77 उमेदवारांची माघार!

साताऱ्यातील अंगापूर तर्फ तारगावमध्ये महिलाराज, ज्येष्ठ नागरीक आणि तरुणाईचा निर्धार

सांगोल्यातील ‘मेथवडे’च्या ग्रामस्थांनी घडवला इतिहास, ग्रामपंचायतीच्या तिजोरीच्या “चाव्या” नवदुर्गांच्या हाती

(Dhotre village elect Ex Servicemen on Gram Panchayat unopposed)