Maharashtra News LIVE : एलपीजी सिलिंडर पुरवठ्यात निश्चितच समस्या, पण काळजी नको – रामदास आठवले
Maharashtra News LIVE Updates : भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विनोद तावडे यांचं अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारलं. तावडे यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवामुळे आणि कुशल नेतृत्वामुळे महाराष्ट्रासह देशाच्या विकासाला निश्चितच मोठा फायदा होईल, असा विश्वास रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर सोमवारी प्रतिबॅरल 120 डॉलरपर्यंत पोहोचलं. याचे पडसाद जगभरातील भांडवली बाजारात उमटले. मुंबई शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. रुपयाही आता नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले असले तरी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली जाणार नाही, असं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. तर साठेबाजी रोखण्यासाठी घरगुती एलपीजी सिलेंडर नोंदणीसाठी किमान प्रतीक्षा कालावधी 21 दिवसांवरून 25 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान इराणबरोबरील युद्ध थांबविण्याचा निर्णय नेतान्याहू यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल, असं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. अशातच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी इराणला पाठिंबा दिला. यासह महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
इराण युद्धामुळे छोट्या उद्योजकांना मोठा फटका
अमेरिका-इराण युद्धामुळे छोट्या उद्योजकांना मोठा फटका बसला आहे. कच्चा माल आणि निर्यात महागल्यामुळे छोटे उद्योजक हवालदिल झाले आहेत. बदलापूर मधील गणेशमूर्तींच्या पॅकेजिंगसाठी उद्योजकांना फोम मिळेनासा झाला आहे.
-
एलपीजी सिलिंडर पुरवठ्यात निश्चितच समस्या, पण काळजी नको – रामदास आठवले
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजी सिलिंडर पुरवठ्यात निश्चितच काही समस्या आहेत, परंतु पेट्रोलियम मंत्रालय लोकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची काळजी घेत आहे आणि पंतप्रधान मोदी देखील यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहेत असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
-
-
युद्धाचा परिणाम लवकरच खाद्य तेलावर होण्याची शक्यता
आखाती देशात होत असलेल्या युद्धाचा परिणाम लवकरच खाद्य तेलावर होण्याची शक्यता? गेल्या आठ ते दहा दिवसांत खाद्य तेलात भाव वाढ झाली आहे. जवळपास 15 लिटरच्या डब्ब्यामागे आठ दिवसात 100 ते 125 रुपये वाढ झाली असून पुढल्या काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रोज तेलाचे भाव कमी जास्त होत आहेत.
-
व्लादीमीर पुतीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात युद्ध संघर्षासंदर्भात फोनवरून चर्चा
अमेरिका-इस्राईल आणि इराण युद्ध काही थांबवण्याचं नाव घेताना दिसत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम आता इतर देशांवर दिसू लागला आहे. असं असताना व्लादीमीर पुतीन आणि ट्रम्प यांच्यात युद्ध संघर्षासंदर्भात फोनवरून चर्चा झाली. हे युद्ध थांबवण्यासाठी पुतीन यांनी प्रस्ताव ठेवला आहे.
-
मध्य पूर्वेतील संकटाचा लोकांवर परिणाम होऊ नये: पंतप्रधान मोदी
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाचा भारतातील नागरिकांवर परिणाम होऊ नये आणि कोणत्याही संभाव्य आव्हानासाठी पूर्ण तयारी सुनिश्चित करावी यासाठी एकत्र काम करण्याचे निर्देश दिले.
-
-
अमेरिकेशी चर्चेचा विषय पुन्हा येणार नाही- अराघची
अमेरिका-इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्ध गेल्या काही दिवसांपासून सुरू असून थांबण्याचं नाव घेत नाही. रोज काही ना काही अपडेट येत आहेत. आता अमेरिकेशी चर्चेचा विषय पुन्हा येणार नाही, असं परराष्ट्र मंत्री अराघची यांनी सांगितलं आहे. अमेरिकेशी चर्चा करण्याचा कटू अनुभव असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे हे युद्ध आता काही थांबणार नाही असंच दिसत आहे.
-
पाकिस्तानात हाहाकार! शाळांना कुलूप, पार्ट्या बंद; वर्क फ्रॉम होम
अमेरिका-इस्राईल आणि इराण यांच्यात युद्ध पेटलं आहे. त्यामुळे इंधानाचा तुटवडा जाणवू लागला आहे. पाकिस्तानात हाहाकार माजला आहे.त्यामुळे लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. शाळांना कुलूप लावण्यात आल आहे. तसेच मंत्र्यांचा पगाराला कात्री लावण्यात आली आहे. इतकंच काय वाहनांचा वापर कमी व्हावा यासाठी वर्क होम लागू करण्यात आलं आहे.
-
होर्मुज सामुद्रधुनीतील युद्ध चिघळल्यास इंटरनेट ठप्प होण्याची शक्यता
भारताची इंटरनेट ट्रॅफिक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाते. त्यामुळे या ठिकाणी युद्ध चिघळल्यास भारतासह अनेक देशांतील इंटरनेट ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासून चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
-
जल जीवन मिशनला 2028 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, जल जीवन मिशन डिसेंबर 2028 पर्यंत वाढवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
-
नाशिकमध्ये तापमानात वाढ, नागरिक हैराण
नाशिक शहरात तापमान वाढत असून मार्चच्या पहिल्या आठवड्यातच नाशिककरांना उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान दुपारच्या वेळी नाशिककर नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून यामुळे नाशिक शहरातील रस्ते दुपारच्या वेळी निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळत आहे. या वाढत्या उन्हामुळे नागरिकांकडून गॉगल, टोपी, हेल्मेट, रुमाल यासारख्या उन्हापासून संरक्षण करणाऱ्या वस्तूंचा वापर वाढत आहे.
-
धाराशिव : चारचाकीचा टायर फुटून भीषण अपघात
उमरगा चौरस्ता येथे फोर व्हीलर चे टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातानंतर गाडी हॉटेलमध्ये घुसली. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये माजी नगरसेवकाचाही समावेश आहे.
-
अकोला : हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा
अकोला जिल्ह्यात पुढील काही दिवस उष्ण लाटेचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने हा इशारा दिला असून नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातील तापमान सातत्याने 40 अंशांच्या वर नोंदवले जात असून पुढील काळात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
-
शेतकऱ्यांना दिलासा, 1 लाख टन कांदा मॉरिशसला निर्यात होणार
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. नाशिक आणि नगरच्या कांद्याला आता मॉरिशसची बाजारपेठ उपलब्ध झाली असून सुमारे 1 लाख टनांहून अधिक कांदा निर्यात होणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत दिली आहे.
-
चालत्या रिक्षाचे चाक निखळले, बीडमध्ये भीषण अपघात
बीड शहरातील नगररोडवर एका चालू रिक्षाचे अचानक टायर निखळल्याने भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या दुचाकीला या रिक्षाने जोराची धडक दिली यामध्ये दुचाकीस्वारासह रिक्षा मधील काही महिला देखील किरकोळ जखमी झाल्या आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र टायर निखळल्यामुळे हा झालेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून शहरात चालणाऱ्या रिक्षासह इतर वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शहरात चालवल्या जाणाऱ्या अनेक रिक्षांचे परवाने, फिटनेस सर्टिफिकेट नसल्याची माहिती मिळत आहे.
-
इराण युद्धाचा जळगावातील युद्योजकांना मोठा फटका, कंपन्या बंद करण्याची वेळ
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा जळगावातील एमआयडीसीतील एकूण 400 प्लास्टिक उद्योग आणि कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. युद्धामुळे प्लास्टिक उद्योगाला आवश्यक कच्चा मालाच्या किमतीमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झाल्याने उद्योजक आर्थिक संकटात सापडले आहेत. वाढत्या किमतीमुळे कच्च्या मालाची खरेदी परवडत नसल्याने कंपन्या बंद ठेवण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. -
धाराशीवमध्ये गॅस पुरवठा बंद, हॉटेल व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता
अमेरिका इराण युद्धाचा परिणाम धाराशीवमध्ये पाहायला मिळतो आहे. येथे व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. जिल्हाभरात भारत व एचपी गॅस कंपनीच्या प्रमुख गॅस वितरण केंद्रावरून हा गॅस पुरवठा बंद झालेला आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा बंद असल्याने हॉटेल व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. -
मुंबई आग्रा महामार्गवर रास्ता रोको
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने मुंबई आग्रा महामार्गवर केला रास्ता रोको. रास्ता रोको मुळे मुंबई नाशिक व नाशिक मुंबई महामार्गाची वाहतूक अर्ध्या तासांपासून विस्कळीत आहे. आदिवासींच्या आरक्षण बंजारा धनगर जातींना देण्यात येऊ नये तसेच आदिवासींची 12500 पदांची विशेष पद भरती करावी यासह अनेक मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला आहे.
-
अमेरिका इराण युद्धाचा परिणाम धाराशिवमध्ये, व्यावसायिक गॅस पुरवठा बंद
अमेरिका इराण युद्धाचा परिणाम धाराशिवमध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाला आहे. जिल्हाभरात भारत व एचपी गॅस कंपनीच्या प्रमुख गॅस वितरण केंद्रावरून गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. घरगुती वापराचा गॅस बाबत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून कमर्शियल गॅस पुरवठा बंद केल्याची पुरवठा विभागाची माहिती.
-
घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक
सोलापुरात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी माहिती दिली आहे. जिल्हात एकूण 94 एजन्सी आहेत. त्या सुरळीत सुरु आहेत.
-
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रालाही गॅस टंचाईच्या झळा
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रालाही गॅस टंचाईच्या झळा पोहोचल्या आहेत. दोन तीन दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक आहे. मंदिर समितीच्या अन्नक्षेत्रामध्ये केवळ दोन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक राहिल्याने अन्नछत्र चालवायचे कसे असा प्रश्न मंदिर समितीकडे उभा राहिला आहे.
-
सोलापूरात दुपारी सिग्नल बंद
सोलापुरात तापमानाची तीव्रता लक्षात घेता शहर पोलिसांकडून दुपारच्या वेळेत सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी दुपारी 12 ते 4 या वेळेत शहरातील सिग्नल यंत्रणा बंद असणार आहे. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी याविषयीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या मोसमात राज्यात सोलापुरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. मार्च महिन्याच्या दुसर्याच आठवड्यात सोलापूरच्या तापमानाचा पारा 40 पार गेला आहे.
-
अमरावतीत जिनिंगला भीषण आग
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी मध्ये कापसाच्या जिनिंगला भीषण आग लागली. शहरातील राठी यांच्या कापूस जिनिगला आग लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. कापूस जिनिंगला आग का लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले आहे.
-
पंचायत सभापती निवडणुकीपूर्वी तीन पंचायत सदस्य गायब
छत्रपती संभाजीनगर पंचायत सभापती निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन पंचायत सदस्य गायब झाले आहेत. भाजपने तीन पंचायत समितीचे सदस्य पळवल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. लताबाई कानडे ,पंढरपूर गण, सतीश हिवाळे , वडगाव कोल्हाटी 101 गण आणि दत्तात्रय वर्पे, वडगाव कोल्हाटी 102 गण असे तिघे गायब आहेत. आज पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक आहे.
-
बुलढाण्यात आठवडाभर पुरेल एव्हढा सिलेंडर साठा
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीची झळ आता राज्यातील नागरिकांना सुद्धा बसताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात गॅस तुटवडा तसेच पेट्रोल डिझेल तुटवडा जाणवत आहे . काही ठिकाणे व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याची ओरड होत आहे. बुलढाणा जिल्ह्यात मात्र आठवडा भर पुरेल एव्हढा गॅस सिलिंडर साठा उपलब्ध असून जिल्ह्यात घरगुती तसेच व्यवसायिक सिलेंडर चा काळा बाजार आणि तुटवडा रोखण्यासाठी जिल्ह्यातील 13 तालुक्यात विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असून जिल्हास्तरीय भरारी पथक स्थापना करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱती जयश्री ठाकरे यांनी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यात तीन गॅस एजन्सीज असून सध्या गॅस चा तुटवडा नाही. व्यवसायिक सिलेंडरचा सुद्धा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन ही प्रशासनाने केले आहे .
-
विरोधकांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एपस्टीन फाईल्स संदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज दिनांक 10 मार्च रोजी विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय, बेलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई येथे बैठक होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर विरोधी पक्षाचे नेते या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर दुपारी 1 वाजता प्रकाश आंबेडकर आणि उपस्थित नेते माध्यमांशी संवाद साधतील.
-
पत्राचाळ रहिवाशांचे पाच दिवसांपासून साखळी उपोषण
गोरेगावमधील पत्राचाळ येथील रहिवासी गेल्या पाच दिवसांपासून साखळी उपोषणावर बसलो आहे. पत्राचाळचे रहिवासी म्हणतात की पत्राचाळ रहिवासी यांचा आज सलग ५ वा दिवस हा साखळी उपोषण चा आहे. म्हाडाच्या मुजोर कारभारावर आक्षेप व हक्क आम्हाला मिळत नाही आहेत म्हणून हे साखळी उपोषण सुरू आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस साठी मोठ्या रांगा
छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस साठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. वाळुज एमआयडीसी भागात भारत गॅस एजन्सीवर नागरिकांच्या मोठ्या रांगा., गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने गॅस सिलेंडर भरून घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. बुकिंग असूनही गॅस मिळत नाही, ब्लॅक ने गॅस विक्री होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस साठी मोठ्या रांगा
छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळुज एमआयडीसी भागात भारत गॅस एजन्सीवर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने सिलेंडर भरून घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. बुकिंग असूनही गॅस मिळत नाही, ब्लॅकने गॅस विक्री होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
-
नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना इराण-अमेरिका तणावाचा फटका
इराण-अमेरिका तणावाचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. युद्धामुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याभरात केळीचे दर 2200 वरून 1200 वर आलेत. नंदुरबार जिल्ह्यात केळी उत्पादक अडचणीत सापडले आहेत, बाजारभाव घसरल्याने नुकसानाची भीती सतावत्ये. उत्पादन खर्च वाढला, पण दर घसरल्याने केळी उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडलंय.
-
आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम
आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर स्थानिक बाजारात घसरले आहेत, मुंबईतही भाजीपाला स्वस्त झाला आहे. निर्यातीत घट झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
असंख्य कंटेनर अडकल्यामुळे 100 टन आवकीपैकी 20टन भाजीपाला स्थानिक बाजारात राहिला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. परदेशात निर्यात होणारा उच्च दर्जाचा भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध झाल्यामुळे किंमती कमी झाल्या, अशी माहिती समोर आली आहे.
-
अमरावती – भाजपच्या पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज प्रशिक्षण कार्यशाळा….
भाजपच्या पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज अमरावतीत प्रशिक्षण कार्यशाळा आहे. भाजपच्या प्रशिक्षण कार्यशाळेला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. अमरावती ,यवतमाळ बुलढाणा वाशिम ,अकोला या पाचही जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी प्रशिक्षण मेळाव्याला हजर राहतील.
-
छत्रपती संभाजीनगर – साडीच्या दुकानाचे कुलूप तोडून 2 लाखांच्या साड्या केल्या चोरी
छत्रपती संभाजीनगर येथील सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात चोरट्याने मध्यरात्री साडीच्या दुकानाचे कुलूप तोडून 2 लाख 38 हजार 789 रुपयांच्या साड्या चोरी केल्या. चोरट्याची ही कृती CCTV मध्ये कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
-
चंद्रपूर जिल्ह्यातील बामर्डा हत्याकांड; वर्ध्याच्या वाळूमाफिया टोळीवर मकोका
चंद्रपूर जिल्ह्यातील बामर्डा रेती घाटातील पैशांच्या वादातून भरत नागपाल या युवकाची निघृण हत्या करण्यात आली होती. या वाळूमाफियांविरुद्ध चंद्रपूर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. संघटित टोळी बनवून दहशत निर्माण करणाऱ्या अमोल कामडी आणि त्याच्या ११ साथीदारांवर ही कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
-
कल्याणमध्ये यूपीएससी परीक्षेत दोन विद्यार्थी पास, सभागृहात सत्कार
कल्याणच्या यूपीएससी परीक्षेत पारस मेस्त्री आणि प्रणव बेंढारी यांचे नेत्रदीपक यश
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) निकालात कल्याणच्या दोन सुपुत्रांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. पारस मेस्त्री आणि प्रणव बेंढारी यांनी या कठीण परीक्षेत यश संपादन केले आहे. या दोघांच्या यशामुळे कल्याण शहराचे नाव पुन्हा एकदा देशपातळीवर उज्ज्वल झाले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी कल्याणकरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, या गुणवंतांच्या यशाची दखल घेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
-
इराण-इस्रायल युद्धाचा फटका: मुंबईत एलपीजीचा तुटवडा, व्यावसायिक सिलेंडर महागले
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे मुंबई, पुणे आणि नागपूरसह राज्याच्या अनेक भागांत एलपीजी गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांची वाढ झाल्याने आणि गॅस उपलब्ध नसल्याने मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास शहरातील ५० टक्क्यांहून अधिक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
युद्धामुळे साखर कारखानेही आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता साखर उद्योगावरही दिसू लागला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून केंद्र सरकारने साखर कारखान्यांना दिलेला निर्यात कोटा जवळपास ठप्प झाला आहे. निर्यात थांबल्यामुळे स्थानिक बाजारात साखरेची आवक वाढली असून साखरेचे दर घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी सुमारे ३७०० रुपये प्रति क्विंटलने विकली जाणारी साखर आता जवळपास ३२०० रुपयांवर आली आहे. दर घसरल्यामुळे याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या उसाच्या हमीभावावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
जळगावातील १.३३ कोटींच्या पेट्रोल पंप अपहार प्रकरणी फरार PSI आणि मुलाला बेड्या
जळगावातील पोलिसांच्या मालकीच्या दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरणातील पोलिस उपनिरीक्षक याच्यासह त्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. दक्षता पेट्रोल पंप येथे १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अपहरण, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजे 20 दिवसांपासून पीएसआय वाल्मीक वाघ हा फरार झाला होता. आता पीएसआय वाल्मीक वाघ स्वतः स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात शरण आला असून त्यांची पोलिस अधीक्षक , तपासाधिकारी यांनी चौकशी केली. पोलिस उप निरीक्षकाच्या मुलाच्या बँक खात्याचाही सहभाग समोर आल्याने त्यालाही ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली आहे.
-
आखाती युद्धाचा अमरावतीला फटका, सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट अमरावतीच्या स्वयंपाकघरात उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्थिरतेमुळे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळे नागरिकांना आता बुकिंगनंतरही सिलिंडरसाठी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागत आहे. या टंचाईचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. गॅस एजन्सींनी त्यांना अतिरिक्त सिलिंडर पुरवणे बंद केले आहे. येत्या ५ ते ६ दिवसांत पुरवठा अधिक विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने एजन्सींकडून व्यावसायिकांना गॅस जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढती महागाई आणि सिलिंडरची अनुपलब्धता यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
-
अर्थसंकल्पात अपंगांच्या कल्याणकारी योजनेसाठी 18 कोटींची तरतूद
अपंगांच्या टक्केवारी नुसार प्रतिमहा अनुदान, व्यवसाय कर्ज, अपंग खेळाडूंना प्रोत्साहन अनुदान, आजारी व्यधिग्रस्ताना आर्थिक अर्थसहाय्य, मेळावे, भवन निर्मितीची अर्थसंकल्पात तरतूद. अपंगांच्या विविध योजनांमधून लाभ देण्यासाठी सण 2026-2027 च्या अर्थसंकल्पात 18.88 कोटी रुपयांची तरतूद
-
बनावट अपघाताद्वारे 50 लाखांचा विमा हडपण्याचा प्रयत्न, 9 जण अटकेत
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर बनावट अपघाताचा बनाव करून विमा रक्कम उकळण्याचा प्रकरा समोर आला होता. या प्रकरणात तालुका वैद्यकीय अधीक्षक, चार पोलीस कर्मचारी व इतर आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ५० लाखांचा विमा मिळवण्याचा कट उघडकीस आला आहे.
-
धुळे-सोलापुर महामार्गावरील पाडळसिंगी टोलनाक्यावर वाहतुक कोंडी
बीडच्या पाडळसिंगी येथील धुळे-सोलापूर महामार्गावरील टोलनाक्यावर तांत्रिक अडचणींमुळे काही लेन बंद असल्याने सतत वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनधारकांना टोल पास करण्यासाठी 8 ते 10 मिनिटं ताटकळत थांबावे लागत आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या टोलनाक्यावर अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे दोन लेन बंद असल्याचे टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
-
आखाती देशातील युद्धाचा ऑटो एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
तीन दिवसात एलपीजी गॅस दरवाढीचा भडका दर 61 वरून थेट पोहोचले 75 रुपये प्रति लिटरवर. दरवाढीमुळे रिक्षाचालक अडचणीत, भाडेवाढीची शक्यता. सरकारने ऑटो एलपीजी गॅस दरवाढीवर तोडगा काढावा रिक्षा चालकांची मागणी.
-
वसई विरार महापालिकेत पाणीपट्टीत दुपटीने तर घरपट्टीत 13 टक्क्याने वाढ
वसई विरार महापालिकेत पाणीपट्टीत दुपटीने तर घरपट्टीत 13 टक्क्याने वाढ करण्यात आली. पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी 731.85 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी स्थायी समितीकडे सादर केलेल्या अर्थसंकल्पात तरतूद केली. पाण्याचे वितरण, पाईप लाईन दुरुस्ती, जलकुंभ उभारणे, जलवाहिन्या बदलणे, पाणी पुरवठा योजनेचे बळकटीकरण, विस्तारीकरण, मलनिस्सारण प्रकल्प उभारण्यावर भर असणार आहे.
-
नाशिकची तर्रीदार मिसळ महागण्याची शक्यता
व्यावसायिक गॅस सिलेंडर वाढल्याने मिसळचे दर देखील वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्यावसायिक गॅस काल 2200 रूपये तर आज 2400 रुपये झाले आहे. पैसे देऊन देखील गॅस पुरवठा सुरळीत नसल्याने हॉटेल व्यावसायिक हैराण झाले आहेत. दररोज गॅसचे दर वाढत असल्याने हॉटेल चालकांची डोकेदुखी वाढली आहे.
-
मुद्रांक शुल्क टाळल्यास लाखाचा दंड; अर्थसंकल्पात तरतूद, निर्णयाला लवकरच अंतिम स्वरूप
घर वा मालमत्ता खरेदी नोंदणीच्या वेळी मुद्रांक शुल्काची योग्य आणि निश्चित रक्कम न भरल्यास यापुढे एक लाख रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दंडाची रक्कम यापूर्वी ५ हजार रुपये एवढी होती. मात्र, राज्य सरकारने त्यात २० पटीने वाढ करण्याचा निर्णय घेत २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात तरतूद प्रस्तावित केली आहे. या निर्णयाला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
-
अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा मुंबईत दाखल; मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये गंभीर स्थिती आहे. मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय देखील कुवेतमध्ये अडकला होता. विखाशा सुभेदार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीसाठी सरकारकडे विनंती केली होती. यानंतर राज्य सरकार त्यांच्या मदतीला धावलं होतं. विशाखा सुभेदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
-
दोन मते अवैध ठरल्याने साक्षी दळवी विजयी, नऊ प्रभाग समित्यांवर भाजपची सरशी
मुंबई महानगरपालिकेच्या एस आणि टी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत विरोधकांची दोन मते अवैध ठरल्यामुळे भाजपच्या नगरसेविका साक्षी दळवी यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. महानगरपालिकेच्या सन २०२६-२०२७ या वर्षासाठी १७ प्रभाग समित्यांपैकी एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन तसेच एस आणि टी या पाच प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका सोमवारी पार पडल्या.
-
बदलापूर नगरपालिकेचा 1 हजार 98 कोटीचा अर्थसंकल्प
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 1 हजार 98 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. बदलापूरच्या नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी 11.76 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही. महत्वाचं म्हणजे मालमत्ता करात 50 टक्के सवलत आणि नगराध्यक्षा कन्या सन्मान योजनेसारख्या महत्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे. नगराध्यक्षा सुकन्या योजनेच्या माध्यमातून बदलापुरात जन्माला येणाऱ्या मुलीचं स्वागत केलं जाईल. तिच्या नावाने 5 हजारांची ठेव ठेवण्यात येईल, वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या ठेवीचा शिक्षणासाठी उपयोग करता येईल.
-
वाकोला-बीकेसी पूल एप्रिलमध्ये सेवेत
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काही वर्षांपूर्वी सांताक्रुझ- चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाअंतर्गत वाकोला ते वांद्रे-कुर्ला संकुल उड्डाणपुलाचे ९६ टक्के काम पूर्ण झाले असून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. पूल सेवेत दाखल झाल्यास बीकेसी ते पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यानचा प्रवास अतिजलद होईल.
शेवटचा बीकेसी ते वाकोला उड्डाणपूल अद्याप सेवेत दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, विद्यापीठ जंक्शन आणि बीकेसी जंक्शन येथे पोहोचणे सोपे व्हावे यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. दोन मार्गिकांचा आणि सुमारे ६४५ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल झाल्यास बीकेसीतून पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोहोचणे सोपे होईल.
-
नंदुरबार आगारातील एसटी बसचा धक्कादायक प्रकार
शनिमांडळ ते नंदुरबार मार्गावर धावणारी बस क्रमांक MH 14 BT 1801 ही रात्रीच्या वेळी विना हेडलाईट रस्त्यावर धावत असल्याचे दिसून आले. ६० ते ७० किमी वेगाने अंधारात बस धावत असल्याने महामंडळाचा भोंगळ कारभार उघडकीस आला. हेडलाईट बंद असतानाही बस वेगाने धावत असल्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत आहे का? असा प्रश्न उपस्थित. समोरून येणाऱ्या वाहनांना बस दिसणे कठीण होत असल्याने प्रवासी व वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला…..
-
निवडणूक होऊनही मीरा-भाईंदर फेरीवाला समिती ‘कागदावरच’
निवडणूक होऊनही मीरा-भाईंदर फेरीवाला समिती ‘कागदावरच’ आहे. अजूनही समिती स्थापन करण्यात आलेली नाही. ५ महिन्यांपासून राज्य शासनाकडून अधिसूचनेची प्रतीक्षा केली जातेय. पालिका आयुक्तांसह ७ सदस्य नियुक्तीच्या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. समिती रखडल्याने पालिकेच्या कारवाईमुळे फेरीवाल्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
-
नाशिक – महसूल विभागातून २३ वर्षांपूर्वी गहाळ झालेली फाईल सापडली
नाशिक – महसूल विभागातून २३ वर्षांपूर्वी गहाळ झालेली फाईल सापडली. त्र्यंबक रोडवरील पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणाची ही फाईल होती. २००३ मध्ये तहसील कार्यालयातून फाईल गहाळ झाली होती. माहिती अधिकारातून कागदपत्रे मागवली होती, मात्र फाईल गहाळ झाल्याचं सांगण्यात आलं होतं. राज्य माहिती आयोगाने चौकशीचे आदेश दिले होते, त्यानंतर कारवाई सुरू झाली होती. फाईल गहाळ झाल्याचा सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Published On - Mar 10,2026 8:01 AM
