Eknath Shinde : कामं प्रलंबित का? एकनाथ शिंदेंनी घेतली मंत्री, अधिकाऱ्यांची 2 तास शाळा; प्रश्नांचा भडीमार!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व खात्यांचा आढावा घेतला आहे. या बैठकीला मंत्र्यांसह त्यांचे अधिकारी देखील उपस्थित होते. बैठकीत खातेनिहाय कोणती काम पूर्ण झाली आहेत, किती कामे प्रलंबित आहेत, प्रलंबित असण्यामागची कारणं काय? यांची शिंदे यांनी माहिती घेतली.

Eknath Shinde : मी लोकांमध्ये राहणारा, लोकांमध्ये मिसळणारा नेता आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच सांगतात. राज्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे शिंदे नेहमीच सांगतात. रात्री अपरात्रीही नेहमीच अपलब्ध असणारे नेते म्हणूनही त्यांची ख्याती आहे. कामात कुचराई केली तर ते अधिकारी, मंत्र्यांनाही सुनावण्यास मागेपुढे पाहात नाहीत. अधिकाऱ्यांना जाब विचारतानाचे अनेक व्हिडओ याआधीही समोर आलेले आहेत. दरम्यान आता शिंदे यांनी मंत्री तसेच काही अधिकाऱ्यांची दोन तास शाळा घेतली आहे. सध्या कोणती कामे चालू आहेत, कोणती कामे रखडलेली आहेत, विकासकाम रखडण्याचे कारण काय? अशा प्रश्नांचा भडिमारच त्यांनी अधिकाऱ्यांवर केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
नेमकं काय घडलं?
सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व खात्यांचा आढावा घेतला आहे. या बैठकीला मंत्र्यांसह त्यांचे अधिकारी देखील उपस्थित होते. बैठकीत खातेनिहाय कोणती काम पूर्ण झाली आहेत, किती कामे प्रलंबित आहेत, प्रलंबित असण्यामागची कारणं काय? यांची शिंदे यांनी माहिती घेतली. सोबतच काम प्रलंबित का आहेत? निधीचा तुटवडा आहे का? याबाबतही शिंदे यांनी मंत्री तसेच संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना शिंदे यांनी विचारले आहे.
अंतिम टप्प्यात सुरू असलेल्या प्रकल्पांवर जोर द्या
याआधी लोकांची कामे होत नाहीत अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याच तक्रारींची दखल घेत शिंदे यांनी मंत्री तसेच अधिकाऱ्यांची दोन तास शाळा घेतल्याचे सांगितले जात आहे. यासह शिंदे यांनी अंतिम टप्प्यात सुरू असलेल्या प्रकल्पांवर जोर द्या, असा आदेशही मंत्री, अधिकाऱ्यांना दिला आहे. ही कामे पूर्ण करताना निधीची कमतरता पडणार नाही, असंही यावेळी त्यांनी अधिकारी, मंत्र्यांना सांगितलंय.
भविष्यात काय होणार?
दरम्यान, महायुती सरकार राज्याच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील आहे, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जाते. भविष्यातही पायाभूत सुविधांच्या विकासावर आम्ही काम करू, असे या सरकारकडून सांगितले जाते. असे असताना शिंदे यांनी बैठक बोलावल्यामुळे आणि मंत्री, अधिकाऱ्यांना सूचना केल्याने भविष्यात काय होणार, प्रकल्पांना गती मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
