मी रात्री झोपू शकत नाही, कपड्यांवर बोलत असाल तर धोतर नेसा; रिया भडकली
आंदोलनानंतर ट्रोलिंग आणि धमक्यांना सामोरी गेलेल्या रिया अहिरने तिच्या कपड्यांवरील टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "माझ्या कपड्यांवर बोलण्याआधी ३० दिवस धोतर नेसा!" असे सुनावत, तिने महिलांच्या जगण्याच्या हक्कावर आणि स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सायबर तक्रार दाखल करत ट्रोलर्सनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली.

मुंबईत तरुणांचं आंदोलन सुरू असताना पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहिर प्रचंड प्रसिद्ध झाली आहे. सोशल मीडियातून रियाच्या या धाडसाचं कौतुक होत आहे. तसंच तिच्यावर टीकाही होत आहे. तिला ट्रोल केलं जात आहे. तिला धमकावल्याही जात आहे. या पार्श्वभूमीवर रियाने आज ट्रोलर्सला चांगलंच झापलं आहे. मला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. मी रात्री झोपूही शकत नाही, असं रियाने म्हटलं आहे.
रिया अहिरने मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने गेल्या तीन दिवसापासून तिला येत असलेला अनुभव विशद केला आहे. हा अनुभव अत्यंत दाहक असल्याचं तिच्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे. माझ्यासोबत चुकीचं होत आहे, त्याविरोधात मी आवाज उठवत आहे. मी रात्री झोपू शकत नाहीये. सतत विचार सुरू असतात. जे मला बोलत आहेत त्यांनी स्वतःला आरशात पाहावं. माझ्या कपड्यांवर बोलत असाल तर स्वतः 30 दिवस धोतर नेसा. मग बोला, असा हल्लाच रियाने टीकाकारांवर चढवला आहे.
जगण्याचा हक्क नाहीये का?
आमच्याकडे काही फंडिंग नाही. पण माझ्याकडे थोडी मीडिया आहे. माझा देश बदल आहे. आम्ही सीजेपी आहोत. चिल्लर जनता पार्टी आहोत. ही चिल्लर पडते तेव्हा देशात आवाज उठतो. आंदोलन करणारी मुलं तुम्हाला आतंकवादी वाटतात?, असा सवाल तिने केला. मी सकाळी 10 वाजेपासून रात्री 7 वाजेपर्यंत आंदोलनाच्या ठिकाणी होते. मला जगायचा हक्क नाहीये का? मला शिव्या दिल्या जात आहेत? मुलींनी शिकलं पाहिजे की नाही हे मला समजत नाहीये? की मुलींनी फक्त पडद्याआड राहावं? असा संतप्त सवालही तिने केला.
जाहीर माफी मागा
मी सायबरमध्ये तक्रार केली. काही मुली माझे फोटो पोस्ट करत आहे. त्या मुलींना पण शिव्या दिल्या जात आहेत. मुलींबाबत काहीही बोलणाऱ्यांविरोधात ही केस आता आदर्श बनवणार आहे. ज्यांच्या विरोधात केस दाखल केली. त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करतानाच माझ्या विरोधात पण गुन्हा दाखल केला आहे, असं तिने सांगितलं.
कंगनाने…
यावेळी तिने अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावतवरही भाष्य केलं. बॉलिवूडमधील माफियांविरोधात ती लढली. आता ती मुलांच्या विरोधात बोलत आहे, याचं मला वाईट वाटतंय. तिने शिक्षण माफियांविरोधात लढायला हवं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही, असं तिने सांगितलं. इंग्लिश लिटरेचरसाठी मी प्रवेश घेतला. मी फॉर्म भरला. पण मला अजून युनिव्हर्सिटीने बोलवलं नाही. शिक्षण व्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, असंही ती म्हणाली.
