Pune Dilip Walse Patil : ‘…तर आपल्याकडेही इतर देशांसारखी परिस्थिती’; राजीव गांधींना अभिवादन करत दिलीप वळसे पाटलांची मंचरमध्ये टीका

स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतींना यावेळी वळसे पाटील यांनी उजाळा दिला. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्यावर जबाबदारी आली. ही जबाबदारी मोठी होती. ती त्यांनी समर्थपणाने पेलली, असे वळसे पाटील म्हणाले आहेत.

Pune Dilip Walse Patil : ...तर आपल्याकडेही इतर देशांसारखी परिस्थिती; राजीव गांधींना अभिवादन करत दिलीप वळसे पाटलांची मंचरमध्ये टीका
राजीव गांधींना अभिवादन करत केंद्र सरकारवर टीका करताना दिलीप वळसे पाटील
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 21, 2022 | 1:16 PM

मंचर, पुणे : सत्तेत बसलेले काही लोक वेगवेगळे आणि भावनात्मक प्रश्न निर्माण करून समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केला आहे. केंद्र सरकारवर त्यांनी टीका केली आहे. स्व. राजीव गांधींच्या स्मृती दिनानिमित्त आंबेगाव तालुक्यातील मंचर (Manchar) येथे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार आणि त्यांची कार्यपद्धती यावर त्यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की याच पद्धतीने देश जर चालत राहिला तर अन्य देशात सुरू असलेल्या परिस्थितीसारखे चित्र आपल्या देशातही उभे राहील. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा एकता आणि समानतेच्या विचारांचा अंगीकार करावा. सर्व घटकांना पुढे घेऊन जाण्याचे काम करण्याचे आवाहन यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

‘सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेतले’

स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतींना यावेळी वळसे पाटील यांनी उजाळा दिला. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्यावर जबाबदारी आली. ही जबाबदारी मोठी होती. ती त्यांनी समर्थपणाने पेलली. आज आपण जे तंत्रज्ञान वापरतो, विशेषत: संगणकासारखे तंत्रज्ञान राजीव गांधी यांची देण आहे. त्यांनी देशाला पुढे नेण्यासाठी सर्वांना सोबत घेतले. त्यात कोणताही भेद केला नाही. सर्व जातीधर्माच्या लोकांना एकोप्याने वागण्याच्या, घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली. संगणकाच्या क्षेत्रामध्ये क्रांती करण्याचे काम त्यांनी केले. सामान्यातील सामान्य लोकांना जगातील ज्ञान त्या माध्यमातून प्राप्त होते, असे ते म्हणाले.

काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?

केंद्र सरकारवर टीका

पुढे ते म्हणाले, की आज दुर्दैवाने सत्तेत बसलेले केंद्रातले लोक देशात, समाजात तेढ कशी निर्माण होईल, यावरच लक्ष केंद्रीत करत आहेत. समाजात अंतर कसे निर्माण होईल, असा प्रयत्न सरकारतर्फे सुरू आहे. याच पद्धतीने देशातील कारभार सुरू राहिला तर इतर देशांत जशी स्थिती आहे, ती होण्याला वेळ लागणार नाही, असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.