महाविकासआघाडीत मीठाचा खडा टाकू नका; संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर अजित पवारांचा इशारा

| Updated on: Mar 28, 2021 | 2:49 PM

हे तीन पक्षांचं सरकार आहे. कुणाला मंत्री करायचं हा तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना अधिकार आहे. | Ajit Pawar Sanjay Raut

महाविकासआघाडीत मीठाचा खडा टाकू नका; संजय राऊतांच्या त्या वक्तव्यानंतर अजित पवारांचा इशारा
राष्ट्रवादीत कोणाला मंत्री करायचं हा शरद पवार यांचा अधिकार आहे.
Follow us on

मुंबई: अनिल देशमुख यांना राज्याचे गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले, अशी टिप्पणी करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी स्वत: याबाबत भाष्य करण्याचे टाळले असले तरी नवाब मलिक आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी संजय राऊत यांना खडे बोल सुनावले आहेत. कोणत्याही नेत्याने महाविकासआघाडीत मीठाचा खडा टाकू नये, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. (Ajit Pawar reaction on Sanjay Raut statement about HM Anil Deshmukh)

ते रविवारी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. हे तीन पक्षांचं सरकार आहे. कुणाला मंत्री करायचं हा तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना अधिकार आहे. राष्ट्रवादीत कोणाला मंत्री करायचं हा शरद पवार यांचा अधिकार आहे. हे तीन पक्षाचं सरकार असताना या पक्षांशी संबंधित व्यक्तींनी एकमेकांना वक्तव्य करुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये. शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत, मंत्री कोण असावेत हे ठरवलं आहे. त्यामुळे महाविकासआघाडी एकत्रित काम करत असताना कुणीही त्यात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये, असे अजित पवार यांनी सांगितले.

काय म्हणाले होते संजय राऊत?

देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असे संजय राऊत यांनी ‘सामना’तील रोखठोक या सदरात नमूद केले होते.

अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल, असा टोलाही राऊतांनी अनिल देशमुख यांना लगावला होता.

संबंधित बातम्या : 

उद्धव ठाकरेंना कणा नाही, राज्यात नवीन सरकार आलं पाहिजे: प्रकाश आंबेडकर

…म्हणून शरद पवारांनी अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद सोपवले, शिवसेनेचा गौप्यस्फोट

शरद पवारांनी चर्चा करुन सर्वांना जबाबदारी दिली, नवाब मलिकांचे वक्तव्य

(Ajit Pawar reaction on Sanjay Raut statement about HM Anil Deshmukh)