Pune : जवान नवनाथ भांडेंवर पुण्यातल्या भोंगवलीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; पंचक्रोशीत शोककळा

| Updated on: Jun 05, 2022 | 1:39 PM

मागील दहा दिवसांत तिसऱ्या जवानाला महाराष्ट्राने गमावले आहे. 27 मेला लडाखमध्ये सैन्याच्या वाहनाला अपघात झाला होता. हे वाहन थेट नदीत कोसळले होते. त्यात एकूण सात जवान शहीद झाले. यातील दोन महाराष्ट्रातील होते.

Pune : जवान नवनाथ भांडेंवर पुण्यातल्या भोंगवलीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; पंचक्रोशीत शोककळा
नवनाथ भांडे यांची भोंगवलीत अंत्ययात्रा
Image Credit source: tv9
Follow us on

भोर, पुणे : पुण्याच्या भोर तालुक्यातील भोंगवली गावाचे जवान नवनाथ शंकर भांडे (Navnath Shankar Bhande) यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 3 जूनला छत्तीसगडच्या रायपूर (Raipur) येथे कार्यरत असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी भोंगवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक भाऊ असा परिवार आहे. नवनाथ यांचे यांचे वय 41 वर्ष होते. नवनाथ यांच्या जाण्याने भोंगवली गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. तर कुटुंबीयांनादेखील दु:ख अनावर होत आहे. भोर, वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांच्यासह तालुक्यातले बडे नेते यावेळी उपस्थित होते. नवनाथ यांना निरोप देण्यासाठी संपूर्ण भोर तालुक्यासह राज्यभरातून नागरिक मोठ्या संख्येने आले होते.

ग्रामस्थांनी काढली अंत्ययात्रा

रायपूर येथे देशसेवेत कार्यरत असताना शुक्रवारी त्यांना वीरमरण आले. शनिवारी रात्री उशीरा भोंगवलीत त्यांचे पार्थिव आणण्यात आले. तर रविवारी सकाळ 9 वाजता भोंगवली येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार विधी करण्यात आले. अंत्यसंस्कारापूर्वी त्यांच्या पार्थिवाची ग्रामस्थांनी गावातून अंत्ययात्रा काढली. शासकीय इतमामात हा विधी होत असल्याने लष्करही याठिकाणी हजर होते. लष्कराच्या जवानांनी त्यांना सलामी दिली. त्यानंतर 12 वर्षांचा मुलगा राज याने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. नवनाथ भांडे यांच्यामागे आई पार्वती, पत्नी विद्या आणि 12 वर्षांचा मुलगा राज असा परिवार आहे.

12 वर्षांचा मुलगा राज याने दिला अग्नी

भांडे हे पुढील महिन्यात लष्करी सेवेतून सेवानिवृत्त होणार होते. परंतु त्यापूर्वीच त्यांना वीरमरण आल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर तर कोसळला आहेच मात्र तालुक्यातही शोककळा पसरली आहे.

हे सुद्धा वाचा

दहा दिवसांत तीन जवान गमावले

मागील दहा दिवसांत तिसऱ्या जवानाला महाराष्ट्राने गमावले आहे. 27 मेला लडाखमध्ये सैन्याच्या वाहनाला अपघात झाला होता. हे वाहन थेट नदीत कोसळले होते. त्यात एकूण सात जवान शहीद झाले. यातील दोन महाराष्ट्रातील होते. साताऱ्याचे विजय शिंदे तर कोल्हापूरचे प्रशांत जाधव हे या दुर्घटनेत शहीद झाले. या जवानांवर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.