गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, मंत्रीपदाची अट, नागपूरचे दोघे…; पृथ्वीराज चव्हाण यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते. त्यासाठी त्यांनी काही अटी घातल्या होत्या. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा मुंडे यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यास ग्रीन सिग्नल होता. पण तत्त्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंडेच्या प्रवेशाला विरोध केला होता, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते. त्यासाठी त्यांनी मंत्रिपदाची अटही घातली होती. नागपूरच्या दोन नेत्यांमुळे आपण निवडून येणार नसल्याचं मुंडेंचं म्हणणं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मुंडे यांच्या प्रवेशाला तत्त्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा विरोध होता, असंही त्यांनी म्हटलंय. पृथ्वीराज चव्हाण यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. चव्हाण यांच्या या गौप्यस्फोटावर भाजपमधून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपा नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते. मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आणि अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांनी मंत्री करण्याची अट घातली होती, मंत्रीपद न द्या अन्यथा नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत, असं मुंडे म्हणाले होते, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
मनमोहन सिंगांचा विरोध
गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशा संदर्भात हायकमांड सोनिया गांधींशी चर्चाही झाली होती. सोनिया गांधी यांनी मुंडेंच्या प्रवेशाला परवानगी दिली, मात्र तत्त्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विरोधी पक्षातल्या खासदाराला आपल्याकडे घेऊन मंत्री करणार नाही, अशी भूमिका घेतल्यानं प्रवेश झाला नाही. या सर्व घडामोडीत मी पंतप्रधानाकड न जाता मी थेट सोनिया गांधी यांच्याकडे गेलो याचा पश्चाताप होतो, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
सरकार पॅनिक परिस्थितीत
दरम्यान, कालही पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर टीका केली होती. प्रधानमंत्री मोदी आता व्हिडिओ करत आहे, मोदी सरकार आता पॅनिक परिस्थितीत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री पद ज्यांना दिल आहे त्यांनी आधीच अकलेचे तारे तोडले आहेत. शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेत बदल घडवून आणेल असा व्यक्ती मला मोदी सरकारमध्ये दिसत नाही. केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच नावही आघाडीवर होतं. पण परिस्थिती बदलली, असं ते म्हणाले. मोदी सरकारला 2029 च्या निवडणूकीची खात्री नाही, 2/3 बहुमतासाठी राजकीय पक्ष फोडले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
पण परिस्थिती बदलली
डीलिमिटेशनच्या प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध आहे. दक्षिणेतील राज्यांनी गेल्या काही वर्षांत प्रगती साधली आहे. त्यामुळे हे बिल पास झाल्यास प्रादेशिक समतोल ढासळणार असल्याने डीलिमिटेशनला विरोध आहे. पण विरोधी पक्षच संपवून टाकायचा हे सरकारचं धोरण आहे, असा आरोपही त्यांनी केला.
पवारांच्या भूमिकेला विरोध
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवरही टीका केली. डीलिमिटेशनच्या प्रस्तावावर शरद पवार गटाकडून घेण्यात येणाऱ्या भूमिकेला आमचा विरोध आहे, असं त्यांनी सांगितलं. तर देवेंद्र फडणवीस केंद्रात शिक्षण मंत्री होणार होते. तशी चर्चा आहे. मात्र आम्हाला चांगला शिक्षण मंत्री पाहिजे. तुमच्या पक्षात जर योग्य व्यक्ती नसेल तर इतर पक्षातून घ्या, पण देशाला चांगला शिक्षण मंत्री द्या, असा टोला त्यांनी लगावला.