Monsoon Update : पुढील पाच दिवस कुठे यलो ऑरेंज अन् कुठे यलो अलर्ट, पावसाचा जोर कसा असणार

Monsoon and Rain in Maharashtra : राज्यात कालपासून अनेक ठिकाणी पाऊस पडू लागला. मुंबई अन् विदर्भात मान्सून दाखल झाला आहे. आता आगामी पाच दिवस राज्यात कसा असणार पाऊस? याचा अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे.

Monsoon Update : पुढील पाच दिवस कुठे यलो ऑरेंज अन् कुठे यलो अलर्ट, पावसाचा जोर कसा असणार
| Updated on: Jun 24, 2023 | 4:11 PM

पुणे : गेल्या पंधरा दिवसांपासून प्रतिक्षेत असणार मान्सून राज्यातील अनेक भागांत दाखल झाला आहे. विदर्भात मान्सूनची एन्ट्री झाली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने थांबवलेला मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरु झाला आहे. २३ जूनपासून राज्यातील अनेक भागांत मान्सून सक्रीय झाला आहे. त्यानंतर २४ जून रोजीही अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. मुंबई, पुणे अन् कोकणात पाऊस सुरु झाला आहे. राज्यात अजून कोठेही वाहून निघेल असा पाऊस झालेला नाही. आता भारतीय हवामान विभागाने पावसाचा सकारात्मक अहवाल दिला आहे. पुढील पाच दिवसांसाठी काही ठिकाणी यलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्टसुद्धा दिले आहे.

कुठे कसा पडणार पाऊस

राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असणार आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी टि्वट करुन दिली. पुढील पाच दिवसांत कोकण अन् विदर्भात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस असणार आहे. पुणे, सातारा, नाशिकमध्येही मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र अन् मराठवाडामध्ये ही पावसाचा जोर राहणार आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंद निर्माण झाला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. परंतु शेतकरी वर्गाने अजूनही पेरणी करण्याची घाई करु नये. जमिनीतील ओल पाहून पेरणीसंदर्भात निर्णय घ्यावा, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

रत्नागिरीत मान्सून सक्रीय

रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सक्रीय झाला आहे. रत्नागिरीत पावसाची दमदार एंट्री शनिवारी झाली. यामुळे
शेतकऱ्यांसमोरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, दापोलीसह जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. कोकणातील वातावरण पावसामय झाले आहे.

इगतपुरीत दमदार पाऊस

पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरीत 6 ते 9 जून दरम्यान पाऊस दरवर्षी आपली जोरदार हजेरी लावतो. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ही परंपरा यंदा खंडीत झाली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज इगतपुरी शहरासह परिसरात वरून राजाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या अर्ध्या तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या आगमनामुळे बळीराजा सुखावला आहे. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.