लोकसभेसाठी बारामती मतदारसंघ चर्चेत; कुणाला उमेदवारी दिली जाणार? जयंत पाटील म्हणाले…

| Updated on: Sep 24, 2023 | 5:20 PM

Jayant Patil on Loksabha Election 2024 : 2024 ची लोकसभा निवडणूक, बारामती मतदारसंघ आणि उमेदवारी; जयंत पाटील काय म्हणाले? कुणाला उमेदवारी दिली जाणार? महाविकास आघाडीची भूमिका काय? शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या त्या फोटोवर काय स्पष्टीकरण दिलं? वाचा सविस्तर...

लोकसभेसाठी बारामती मतदारसंघ चर्चेत; कुणाला उमेदवारी दिली जाणार? जयंत पाटील म्हणाले...
Follow us on

पुणे | 24 सप्टेंबर 2023 : अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. इथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येत्या निवडणुकीत बारामतीतून कुणाला उमेदवारी दिली जाणार? महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार? असा प्रश्न विचारला असता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. मी माझ्या पक्षाच्या उमेदवाराबाबत सांगू शकतो. कोण कुणाला तिकीट देईल हे माहिती नाही. पण राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेच 2024 ची निवडणूक लढवतील. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन कुठून कोण लढेल हे ठरवू, असं जयंत पाटील म्हणाले.

शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संसदेचं अधिवेशन असताना अनेक खासदार एकत्र भेटतात. फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरला नसेल म्हणून काढला असेल. उद्यागपती अदानी यांनी नवा उद्योग सुरू केला आहे. त्यांच्या उद्घाटनाला पवार गेले यात गैर काय आहे. तो प्रकल्प काही आपल्या राज्यातून गेलेला नाही. त्यांना नवा प्रकल्प साहेबाना दाखवायचा असेल. पवारसाहेब इंडिया आघाडीमध्ये सध्या आहेत. त्यात काही शंका घेऊ नये, असं जयंत पाटील म्हणालेत.

भावी मुख्यमंत्री म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे बॅनर लागले आहेत. त्यावर तुम्हाला काही ऑब्जेक्शन आहे का? आम्ही ठरवू… लोकशाहीत पोस्टर कुणीही लावू शकतं. समर्थक कुणाला कुठंही नेऊन बसवतं. पवारसाहेबांकडे जे नेते आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्री व्हावं असे अनेक नेते आहेत. अनेकांचे फ्लेक्स लागतात, असं जयंत पाटील म्हणालेत.

दुष्काळावर सरकार हालचाल करत नाहीये. फक्त घोषणाच होतील कारवाई होणार नाही, असं सध्या दिसत आहे. सरकारकडून कुठीलच नियोजनाची बैठक झाली नाही. नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल आहे. सरकार भूमिका व्यक्त करत नाही.सरकार निवडणुकीत गुंतलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री गणेश मंडळांना भेटी देत आहेत. ते योग्यच आहे पण दुष्काळाकडे देखील लक्ष द्यावं, असंही जयंत पाटील म्हणालेत.