Rain | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार, IMD कडून २४ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

Maharashtra Weather Forecast | राज्यात मान्सून सक्रीय होणार आहे. हवामान विभागाने राज्यातील २४ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे. तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोणकोणत्या भागात दिलाय पावसाचा अलर्ट...

Rain  | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार, IMD कडून २४ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
Rain
Jitendra Zavar | Updated on: Sep 15, 2023 | 2:20 PM

पुणे | 15 सप्टेंबर 2023 : राज्यात ऑगस्टमध्ये रुसलेला मान्सून सप्टेंबरमध्ये सुरु झाला. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. तीन, चार दिवस पाऊस झाल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर राज्यात १४ सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. आता गुरुवारपासून राज्यातील अनेक भागांत रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. आगामी तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला गेला आहे. या पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढणार आहे.

मान्सून सक्रीय होण्यासाठी पूरक वातावरण

पुणे जिल्ह्यासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली गेली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र तयार झाले असून त्याची तीव्रता वाढली आहे. तसेच दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस पूरक ठरल्याने राज्यातच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

कोणत्या भागात पावसाचा अलर्ट

पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर उर्वरित विदर्भासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील एकूण २४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट दिला आहे. यामुळे आगामी चार दिवस पावसाचा अलर्ट कायम राहणार आहे. मुंबई, पुणेसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

गोदिंया जिल्ह्यात पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गुरुवारी रात्रीपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी सुद्धा पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील नदी, नाले वाहण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात हवामान विभागाने येलो अलर्ट जाहीर केलेला असताना पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. गुरुवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरी बरसल्यात.

धरणाचे 15 गेट उघडले

गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्याने पाऊस सुरु आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे 15 गेट अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. धरणातून 65 हजार 845 क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Follow Us