MSEDCL : वीजचोरांना दणका देणार महावितरण, 10 नव्या भरारी पथकांची स्थापना; 54 कोटींहून अधिकचा दंड वसूल

वीजचोरीमुळे महावितरणला मोठा आर्थिक फटका बसतो. अशा वीजचोरांना अद्दल घडवणे गरजेचे आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या भरारी पथकांना अधिक सक्षम करून वीज चोरणाऱ्यांना लगाम घालावा, असे निर्देश देण्यात आले.

MSEDCL : वीजचोरांना दणका देणार महावितरण, 10 नव्या भरारी पथकांची स्थापना; 54 कोटींहून अधिकचा दंड वसूल
महावितरण
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Aug 18, 2022 | 5:59 PM

पुणे : वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने (MSEDCL) 10 नवीन भरारी पथकांची स्थापना केली आहे. त्याद्वारे एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तब्बल 131 कोटी 50 लाख रुपयांची वीजचोरी (Power thieves) उघड झाली आहे. यात 2 हजार 625 प्रकरणे उघड झाली असून 54 कोटी 16 लाख 66 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वीजचोरी, वीजेचा गैरवापर आणि इतर अनियमिता आटोक्यात आणण्यासाठी तसेच वीजचोरांविरुद्ध जलद कारवाई (Immediate Action) करण्यासाठी या पथकांचे काम सुरू आहे. वीज दरवाढीचा बोजा वीज ग्राहकावर पडत असतो. वीजचोरीचा फटका प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना बसतो. अशा ग्राहकांचे हित जपणे गरजेचे आहे. हा उद्देश ठेवूनच महावितरणने अशा वीजचोरांवर कारवाई करण्याचे ठरवले आहे. दंड वसूल करण्यास आता सुरुवात झाली आहे. उर्वरित बिलाची रक्कमदेखील वसूल केली जाणार आहे

‘वीजचोरांना अद्दल घडवणे गरजेचे’

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाची नुकतीच आढावा बैठक घेतली. महावितरणची आर्थिक घडी बसवणे महत्त्वाचे आहे. वीजचोरीमुळे महावितरणला मोठा आर्थिक फटका बसतो. अशा वीजचोरांना अद्दल घडवणे गरजेचे आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या भरारी पथकांना अधिक सक्षम करून वीज चोरणाऱ्यांना लगाम घालावा, असे विजय सिंघल यांनी निर्देश दिले आहेत.

मोठ्या प्रमाणावर दंड वसूल

नोव्हेंबर 2021पासून विभागीय कार्यालय स्तरावर जवळपास 20 भरारी पथके सुरू करण्यात आली. या माध्यमातून प्रतिमहिना वीजचोरी करणारी 20 प्रकरणे उघडकीस आणली आहेत. दरम्यान, महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागात 63 भरारी पथकांसह आठ अंमलबजावणी पथके कार्यरत आहेत. 2 हजार 625 प्रकरणे उघडकीस आणली होती. तर 54 कोटी 16 लाख 66 हजारांचा दंड वसूल करण्यात आला होता.

विविध प्रादेशिक विभागांतील भरारी पथके

महावितरणने आपल्या विविध प्रादेशिक विभागांमध्ये भरारी पथके तैनात केली आहेत. यानुसार पुणे विभागात 14, नागपूर विभागा 15, औरंगाबाद विभागात 12 तर कोकण विभागात सर्वात जास्त म्हणजे 22 पथके तैनात करण्यात आली आहेत. सर्वात जास्त वीजचोरी 2021-22 या वर्षात झाली असून दंडही मोठ्या प्रमाणावर वसूल करण्यात आला आहे.