सांगोल्यातील ‘मेथवडे’च्या ग्रामस्थांनी घडवला इतिहास, ग्रामपंचायतीच्या तिजोरीच्या “चाव्या” नवदुर्गांच्या हाती

| Updated on: Jan 15, 2021 | 7:54 PM

मेथवडे येथील ग्रामस्थांनी गावाच्या चाव्या महिलांच्या हाती देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. (Methawade Gram Panchayat Election)

सांगोल्यातील मेथवडेच्या ग्रामस्थांनी घडवला इतिहास, ग्रामपंचायतीच्या तिजोरीच्या चाव्या नवदुर्गांच्या  हाती
मेथवडे ग्रामपंचायतीवर महिलाराज
Follow us on

सोलापूर: दुष्काळी सांगोला(Sangola) तालुक्यातील मेथवडे (Methawade)येथील ग्रामस्थांनी गावाच्या चाव्या महिलांच्या हाती देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. तब्बल 25 वर्षानंतर निवडणूक बिनविरोध करत गावची सत्ता नवदुर्गांच्या हाती सोपवली आहे. त्यामुळे सांगोल्यातील मेथवडेत काटकसरीने विकासकामे करण्याची संधी मिळाली आहे. (Methawade Gram Panchayat elected as unopposed with women representatives)

25 वर्षानंतर बिनविरोध निवडणूक

सांगोला तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील मेथवडे या गावात मागील पंचवीस वर्षापासून अटीतटीच्या निवडणुका झालेल्या आहेत. इतर गावां सारखंच असणार हे गाव पण यंदा गाव कारभाऱ्यांनी ठरवलं गावची सत्ता महिलांच्या ताब्यात द्यायची. नऊ सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत असूनही विकासाची कामे या गावांमध्ये करणे गरजेचे आहे. प्रमुख मंडळी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, बाजार समिती सभापती गिरीश गंगथडे, जगदीश पाटील या या लोकांनी एकत्र येत नऊ महिलांचे अर्ज नऊ जागांसाठी दाखल केले. गावात असलेल्या सामंजस्यामुळे इतरांनी अर्ज दाखल केला नाही. यामुळे ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली.

महिलांना या ग्रामपंचायतींमध्ये एकदम काम करण्याची संधी मिळालेली आहे. गावांमध्ये असलेले मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी या महिलांचा पुढाकार असेल. गावातील अनेक तरुण व्यसनाधिन होत असल्यामुळे असे व्यसन असणारे व्यवसाय गावातून हद्दपार करण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न असणार आहेत. आरोग्य सुविधा, स्वच्छ पाणी, महिलांसाठी स्वच्छतागृहे यासाठी आपण काम करणार असल्याचं या महिलांचं म्हणणे आहे.

पक्षभेद विसरुन गावासाठी एकत्र

गेल्या 25 वर्षापासून येथे शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आदी पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात लढत होते. यावेळी प्रथमच सर्व पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्यातील सर्व मतभेद बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर एकत्रित येत गावची निवडणूक बिनविरोध करुन महिलांच्या हाती सत्ता दिली आहे. शिक्षण,आरोग्य, वीज आदी मूलभूत सोयीसुविधा निर्माण करुन देण्याचा संकल्प केल्याचं नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्या मनिषा पवार यांनी सांगितले. गावातील अवैध धंदे बंद करुन सुसंस्कारित पिढी निर्माण करण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही यावेळी येथील नवनिर्वाचित सदस्या लक्ष्मी लेंडवे यांनी सांगितले.

आजही ग्रामीण भागातील महिलांना चुल आणि मूल या दोन गोष्टी सांभाळ्या लागतात. समाजकारण आणि राजकारणा पासून दूर असलेल्या येथील महिलांना येथील ज्येष्ठांनी राजकारणात काम करण्याची संधी दिली आहे.येथील ग्रामस्थांनी घेतलेल्या या क्रांतीकारक निर्णय़ाचे सोलापूर जिल्ह्यात सवर्त्र स्वागत केले जात आहे.

संबंधित बातम्या:

जेष्ठ व्यक्तींचा समजुतदारपणा, 50 वर्षांपासूनच्या वादविवादाला पूर्णविराम, सादलगाव ग्रामपंचायत बिनविरोध!

बारामती तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत, सर्वच 77 उमेदवारांची माघार!

साताऱ्यातील अंगापूर तर्फ तारगावमध्ये महिलाराज, ज्येष्ठ नागरीक आणि तरुणाईचा निर्धार

(Methawade Gram Panchayat elected as unopposed with women representatives)