दिल्लीश्वर कितीही कपटी असला तरी महाराष्ट्र झुकणार नाही; जयंत पाटलांचा इशारा

| Updated on: Feb 27, 2022 | 12:43 PM

आपलं सरकार काहींच्या डोळ्यात सलत आहे. त्यामुळे आधी आमदार विकत घेण्याचा प्रयत्न झाला. आता मंत्र्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. अनिल देशमुख यांना खोट्या आरोपात गोवलं... नवाब मलिक यांना खोट्या आरोपात गोवलं...

दिल्लीश्वर कितीही कपटी असला तरी महाराष्ट्र झुकणार नाही; जयंत पाटलांचा इशारा
दिल्लीश्वर कितीही कपटी असला तरी महाराष्ट्र झुकणार नाही; जयंत पाटलांचा इशारा
Follow us on

पुणे: आपलं सरकार काहींच्या डोळ्यात सलत आहे. त्यामुळे आधी आमदार विकत घेण्याचा प्रयत्न झाला. आता मंत्र्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. अनिल देशमुख (anil deshmukh) यांना खोट्या आरोपात गोवलं… नवाब मलिक यांना खोट्या आरोपात गोवलं… नवाब मलिक (nawab malik) एनसीबी विरोधात बोलत होते म्हणून त्यांना त्यांची भूमिका मांडू न देता अटक करण्यात आली. जाणिवपूर्वक दाऊदचं नाव घेतले गेले आणि एका कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीला तुरुंगात टाकण्यात आलं, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी केली आहे. ही मावळची भूमी आहे. इथली माती शिवरायांचे शौर्य आपल्याला सांगते. दिल्लीश्वर कितीही कपटी असला, कितीही कारस्थानी असला तरी महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही. ही परंपरा शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू आहे. ती यापुढेही कायम राहील, असा विश्वास जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला.

जयंत पाटील मावळमध्ये आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपच्या कारवायांवर जोरदार निशाणा साधला. आपल्या विरोधात कारवाया सुरू आहेत. तुम्ही याची नोंद घ्या, आम्ही ठामपणे सांगतो की, महाविकास आघाडी ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आली आहे. कोणीही किती अडथळे आणले तरी महाराष्ट्र सरकार आपले काम पूर्ण करणारच, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राष्ट्रवादीमय असेल

आज तळागाळात पक्ष उभा होत आहे… एक -एक कार्यकर्ता पक्षाशी जोडला जात आहे… आज पक्षाकडे तरुणांची मोठी फळी निर्माण झाली आहे… त्यामुळे उद्याचा महाराष्ट्र हा राष्ट्रवादीमय असणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संकटाचा काळ संपलाय

आमच्या पक्षात आता सुनील शेळके, रोहित पवार, निलेश लंके असे तरुण लोक नेतृत्व करत आहेत. चांगली जबाबदारी पार पाडत आहेत. तुमच्या सर्वांच्या ताकदीने सुनीलअण्णा शेळके जवळपास 1 लाख मतांच्या लीडने निवडून आले. 900 कोटींचा त्यांनी निधी मिळवला आहे. अजून अडीच वर्षे बाकी आहेत. मावळचा कायापालट करण्याचे काम करू. कारण तुमचा माणूस हा माणसासाठी झटणारा नेता आहे. संकटाचा काळ आता संपलेला आहे, आता काळ आपल्या प्रगतीचा आहे आणि या मावळचा विकास सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

संबंधित बातम्या:

वेदनादायी..! क्षेपणास्त्रांमुळे इमारतींची झाली दुरवस्था, विचलित करतील Ukraineमधली ‘ही’ दृश्यं!

VIDEO: महाराष्ट्रातच इन्कम आणि टॅक्स आहेत काय?; संजय राऊतांचा भाजपला सवाल

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे आगाशे, पवार, सहदेव यांना पुरस्कार; नाशिकमध्ये होणार गौरव