रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, ’22 आमदार अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे येणार’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सर्वात मोठा दावा केला आहे. अजित पवार गटातील तब्बल 22 आमदार हे पुन्हा एकदा शरद पवारांच्या गटात येणार आहेत, असा मोठा दावा रोहित पवारांनी केला आहे.

रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, 22 आमदार अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे येणार
Chetan Patil | Updated on: Mar 05, 2024 | 4:33 PM

प्रदीप कापसे, Tv9 प्रतिनिधी, पुणे | 5 मार्च 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही दिग्गज नेते सध्या एकमेकांच्या विरोधात आहेत. अजित पवार यांच्याकडे जास्त आमदारांचं बहुमत आहेत. तर शरद पवार यांच्याकडे फार कमी आमदारांचा पाठिंबा आहे. असं असताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि पवार कुटुंबात कोणतीही फूट पडलेली नाही, असं वक्तव्य केलं आहे. त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. आगामी लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादीचे 22 आमदार परत शरद पवारांकडे येतील, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रोहित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देत असताना याबाबत गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काहीतरी मोठं घडतंय याचे स्पष्ट संकेत मिळताना दिसत आहेत.

“अजित पवार गटातला एक नेता आमदार एकत्रित करतोय. 10 ते 12 आमदार आहेत ते भाजपाच्या चिन्हावर लढायचं म्हणत आहेत. राहिलेले 22 आमदार हे वेगळी भूमिका घेतील. त्यांच म्हणणं असेल की शरद पवारांसोबत चला. मग त्यांच्या पक्षात कोण राहील?”, असा सवाल करत रोहित पवार यांनी अजित पवार गटाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

‘अजित पवारांना लोकसभेच्या फक्त 4 जागा मिळतील’

“बंद खोलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणतील आमचं ऐकावं लागेल. अजित पवारांना लोकसभेच्या फक्त 4 जागा मिळतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 10 जागा मिळतील. अमित शाहांचं त्यांना ऐकावंच लागेल. पण अजित पवारांची भूमिका त्यांच्या पक्षातील सगळ्याच नेत्यांना मान्य असेल असं नाही”, असं रोहित पवार म्हणाले.

“बारामती लोकसभा मतदारसंघात काय होईल हे जनताच ठरवेल. अमित शाह, नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात यावं लागतं. कारण त्यांना लोकांची भीती आहे. बारामतीची जनता ही पवारांच्या आणि विचारांच्या पाठिशी राहील. वेगवेगळे सर्वे असतात. मात्र महाविकास आघाडीला 30 जागा मिळतील. 18 ते 20 जागा महायूतील मिळतील”, असा दावा रोहित पवारांनी केला आहे.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आपल्या पक्षाबाबत आणि पवार कुटुंबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही आणि पवार कुटुंबातही फूट नाही. आमच्या कुटुंबात जे काही होतं त्याला प्रायव्हसीचा अधिकार आहे. मला, शरद पवार, रोहित पवारांना तो अधिकार नाही, पण आमच्या उर्वरित कुटुंबियांना प्रायव्हसीचा अधिकार आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबात, कौटुंबिक वेळात ज्या काही गोष्टी होतात त्या अर्थातच सांगता येणार नाहीत. आता तुम्ही तुमच्या बायकोशी काय बोलता हे थोडी मला सांगणार आहात”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

“एक तर मी लोकशाहीत काम करते. मी माझे वैयक्तिक संबंध कधीच लपवलेले नाहीत. माझे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांसोबत असतात. कारण मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी आहे. त्यामुळे माझे सगळ्यांची राजकीय आणि वैचारीक मतभेद आहेत. माझे कुणाशीही मनभेद नाहीत. लोकशाही आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो. प्रत्येकाची एक स्टाईल आहे. पक्षामध्ये फूट पडलेली नाहीच. शिवाय पवार कुटुंबात तर अजिबात फूट पडलेली नाही”, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us