1 सप्टेंबर रोजी ओबीसींचं वादळ मुंबईत धडकणार; लक्ष्मण हाके यांची हाक
राज्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपामुळे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण झाल्याने लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली 1 सप्टेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मूळ ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण आणि 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी या मोर्चाद्वारे केली जाईल. सरकारने मागण्या मान्य न केल्यास कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा हाके यांनी दिला आहे.

राज्य सरकारने 22 लाख कुणबी प्रमाणपत्रे वाटल्यामुळे मूळ ओबीसींच्या आरक्षणाला आणि स्पर्धेला धोका निर्माण झाला आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात येत्या 1 सप्टेंबर रोजी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा मुंबईत मोर्चा काढणार असल्याचा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला असून या मोर्चात लाखो ओबीसी सामील होणार असल्याचं म्हटलं आहे. ओबीसींच्या 1 तारखेच्या मोर्चासाठी हाके यांच्या नेतृत्वात 60 ते 70 बैठका पार पडल्या आहेत. या आंदोलनात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर ओबीसी नेतेही सामील होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
लक्ष्मण हाके यांनी मीडियाशी संवाद साधताना मोर्चाविषयीची माहिती दिली. यावेळी हाके यांनी मराठा समाजाच्या कुणबीकरणाद्वारे आरक्षणात समावेश करण्याच्या मुद्द्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजाला इतर प्रवर्गातून आरक्षण देण्याला आमचा ठाम विरोध असून, 2 सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मागील एक वर्षाच्या काळात एकाही मंत्र्यांनी नेत्यांनी ओबीसींच्या बाजूने भूमिका न घेतल्याने आमचे आरक्षण धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जर सरकारने आरक्षणाबाबतच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर भविष्यात कोणत्याही नेत्याला किंवा मंत्र्याला भेटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. मंत्री उदय सामंत हे हाके यांना भेटायला येणार होते. या पार्श्वभूमीवर हाके यांनी हा इशारा दिला आहे.
कायदा सुव्यवस्था बिघडली तर…
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी प्रतिनिधींच्या जागांवर होत असलेल्या परिणामावरही हाके यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजाचं आरक्षण खोल समुद्रात नेऊन बुडवलं आहे. त्यामुळेच आम्ही 1 सप्टेंबर रोजी ताकदीने मुंबईत धडकणार आहोत. आम्ही मुंबईतील मोर्चासाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे. परवानगी नाही मिळाली आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सरकारच जबाबदार असेल, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा येडपट माणूस असा उल्लेख केला.
त्या व्हिडिओत इंटरेस्ट नाही
मी आणि नवनाथ आबा गेल्या तीन वर्षांपासून आंदोलन करीत आहोत. आम्ही खांद्याला खांदा लावून ओबीसी एक करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही एकमेकांसोबत भांडू शकतो. एकमेकांसोबत बोलायचं नाही का?, असा सवाल हाके यांनी केला. मी कोणताही गुन्हा केला नाही. आमची ओबीसी बांधवांमध्ये एकमेकांसोबत भांडणे असू शकतात, असंही त्यांनी सांगितलं.
आमच्या वैयक्तिक भांडणात ओबीसी बांधवांना इंटरेस्ट आहे का? असा सवाल करतानाच ओबीसी आरक्षण वाचवायचं असेल तर मुंबईला ओबीसी बांधव येतील. मला असल्या व्हिडिओ व्हायरलमध्ये इंटरेस्ट नाही. आज मला ओबीसी आरक्षण वाचवायचं महत्त्वाच आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.