Pune Ankush Kakde : पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासावर अंकुश काकडेंनी उपस्थित केले प्रश्न, मुरलीधर मोहोळांवर आरोप करत म्हणाले…

बालगंधर्व रंगमंदिरावरील कामाचे आश्वासन देण्यापूर्वी मोहोळ यांनी पूर्वीच्या प्रकल्पांचे काम पूर्ण करायला हवे आणि मतदारसंघांतर्गत येणारे कामही पूर्ण केले पाहिजे. त्यानंतरच, त्यांनी नवीन प्रकल्पांचा विचार करायला हवा, असे अंकुश काकडे म्हणाले आहेत.

Pune Ankush Kakde : पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासावर अंकुश काकडेंनी उपस्थित केले प्रश्न, मुरलीधर मोहोळांवर आरोप करत म्हणाले...
बालगंधर्व रंगमंदिर
Image Credit source: tv9
Pradeep Garad | Updated on: May 19, 2022 | 7:30 AM

पुणे : पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakde) यांनी बालगंधर्व सभागृहाच्या पुनर्विकासाच्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या बालगंधर्व रंगमंदिराच्या (Balgandharva rang mandir) पुनर्विकासाचा प्रश्न वादा सापडला आहे. अनेकांनी या पुनर्विकासासाठी रंगमंदिर पाडण्याला विरोध केला आहे. काकडे यांनी आरोप केला, की माजी महापौर आणि भाजपा नेते मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी गेल्या आठवड्यात बालगंधर्व सभागृहाच्या पुनर्विकासाचे काम 30 महिन्यांत होईल, असा दावा केला होता, मात्र अद्याप कामाला सुरुवातही झालेली नाही. तीच गोष्ट गदिमा सभागृहाची आहे, ज्याचा भूमिपूजन समारंभ 18 मार्च 2021 रोजी झाला होता. यशवंतराव चव्हाण सभागृहाचे काम मोहोळ महापौर असताना सुरू झाले, परंतु ते अद्याप पूर्ण झालेले नाही.

‘आधीचे प्रकल्प पूर्ण करायला हवेत’

काकडे पुढे म्हणाले, की स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नवीन सभागृहाचे काम सुरू झाले, पण अडीच महिने झाले, पण शेवट काही दिसत नाही, असा आरोप काकडे यांनी केला आहे. बालगंधर्व रंगमंदिरावरील कामाचे आश्वासन देण्यापूर्वी मोहोळ यांनी पूर्वीच्या प्रकल्पांचे काम पूर्ण करायला हवे आणि मतदारसंघांतर्गत येणारे कामही पूर्ण केले पाहिजे. त्यानंतरच, त्यांनी नवीन प्रकल्पांचा विचार करायला हवा, असे काकडे म्हणाले आहेत.

‘आरोप करण्यापूर्वी खात्री करावी’

मुरलीधर मोहोळ यांनी काकडेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, की काकडे यांनी आरोप करण्यापूर्वी योग्य माहितीची खात्री करावी. बाळासाहेब ठाकरे सभागृहाचे काम माझे नसून शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांनी प्रस्तावित केले होते. तसेच, गदिमा सभागृहाचे काम सुरू झाले आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी आक्रमक

बालगंधर्व ही पुण्याची शान असून ती पाडू नये आणि कोणाला मल्टीप्लेक्स बांधायचेच असेल तर अनेक जागा उपलब्ध आहेत, अशी खरमरीत टीका नुकतीच लावणीसम्राज्ञी आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा पुणेकर यांनी केली होती. बालंगधर्व ही जुनी आठवण असून बालगंधर्व जर पाडल तर अनेक कलाकारांच्या पोटावर गदा येणार आहे. त्यामुळे ते पाडण्याचा कुणाचा विचार असेल तर आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला होता. अनेक नाट्यकलाकारांचेही असेच काहीसे मत आहे.

Follow Us