Weather Update : पुणे झाले हॉट सिटी, तापमानाचा नवा उच्चांक, कशामुळे आली Heat Wave

| Updated on: May 12, 2023 | 8:55 AM

Pune Temperature : राज्यासह देशभरात तापमानात गेल्या चार दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. राज्यात प्रथमच मे महिन्यात तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. त्याचवेळी पुणे, पिंपरी चिंचवडमधील तापमानाने उच्चांक गाठला आहे.

Weather Update : पुणे झाले हॉट सिटी, तापमानाचा नवा उच्चांक, कशामुळे आली Heat Wave
IMD HEAT WAVE
Follow us on

पुणे : राज्यातील अनेक शहरांमध्ये उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. सर्वत्र अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. राज्यातील तापमानात सलग दुसऱ्या दिवशी हंगामातील उच्चांकाची नोंद झाली आहे. तापमानवाढीमुळे दुपारी रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे. दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत रस्ते ओस पडत आहेत. राज्यात रात्री 8 वाजेपर्यंत तीव्र उकाडा जाणवत असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद जळगाव शहरात झाली.

तापमानाचा उच्चांक

पुणे शहरात मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस होता. त्यामुळे तापमान ३५ अंशांच्या जवळपास होते. परंतु दुसऱ्या आठवड्यापासून वातावरणात बदल होत आहे. ११ मे रोजी पुणे शहरातील कमाल तापमानाने नवा उच्चांक गाठला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात तापमान थेट 44.4 अंश सेल्सिअसवर गेले आहे. यामुळे असह्य करणारा उन्हाचा चटका सध्या पुणेकरांना बसत आहे. सकाळी नऊ वाजेनंतर चटका देणारे ऊन जाणवू लागत आहे. त्यानंतर दुपारी 12 नंतर चटका आणखी वाढत आहे. यामुळे दुपारी रस्तेही ओस पडत आहेत.

हे सुद्धा वाचा

दुपारी बाजारपेठेवर परिणाम

पुणेकरांना सध्या नागपूर, जळगावसारखे तापमान अनुभवण्यास मिळत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम दुपारी बाजारपेठेवर होत आहे. दुपारी ग्राहक येत नसल्यामुळे अनेक दुकानदारांनी दुकाने बंद ठेवण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे सध्या शहरातील सर्वच ठिकाणच्या बाजारेठांतील दुकाने दुपारीच बंद होऊ लागली आहे.

कोरेगाव पार्क सर्वाधिक हॉट

हवामान विभागाकडून कमाल व किमान तापमानाची आकडेवारी जाहीर झाली. त्यानुसार पुणे शहरात 41 अंश तर कोरेगाव पार्कमध्ये सर्वाधिक 44.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हडपसरमध्ये 42, मगरपट्टा 41.7, वडगावशेरीमध्ये 43.1, पाषाण 41.1, चिंचवड 42.5, तळेगाव ढमढेरे 43.8, शिरूर आणि राजगुरूनगर येथे प्रत्येकी 42.9, दौंड 41.5, पुरंदर 41.2, आंबेगाव 41.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

का आली उष्णतेची लाट

बंगालच्या उपसागरात बदल होत आहे. याठिकाणी मोचा वादळ सक्रीय झाले आहे. त्यामुळे अवकाळी पडणारा पाऊस जाऊन राज्यातील कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 44.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.पुढील 72 तासांत यंदाच्या वर्षातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

उष्णतेची लाट

मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. राज्यातील कमाल तापमानात आणखीन वाढ होणार असल्याने उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा चांगला तापला असून, बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमान 40 शीच्या पुढे गेले आहे.