मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्याला दोन मंत्रीपद, कोणाची लागणार लॉटरी

cabinet expansion : राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. या विस्तारासंदर्भात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्यातून कोणाला संधी मिळणार? यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. त्यासाठी तीन नावे चर्चेत आलीय.

मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्याला दोन मंत्रीपद, कोणाची लागणार लॉटरी
Image Credit source: tv9
Jitendra Zavar | Updated on: May 24, 2023 | 9:29 AM

पुणे : राज्यात सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. या निकालानंतर सरकारला धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक इच्छूक आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. यासंदर्भात शिंदे गटातील आमदारांकडून दावाही केला जात आहे. तसेच राज्याच्या विस्तारासोबत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये शिंदे गटातील दोन खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

पुणे जिल्ह्यातून कोणाला संधी

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये माधुरी मिसाळ, राहुल कुल आणि महेश लांडगे ही तीन नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आली आहे. राहुल कुल यांनी याआधीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच जिल्ह्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि शहर असा समतोल साधण्याची शक्यता मंत्रिमंडळ विस्तारात केली जाणार आहे.

संजय शिरसाट, बच्चू कडू यांचा दावा

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. राज्यात कोणाला मंत्री करावे, हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ठरवतील. येत्या काही दिवसांत हा विस्तार व्हावा, अशी मला अपेक्षा असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले. त्याचवेळी बच्चू कडू यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराचा दावा केला होता.

शिंदे गटाकडून यांची नावे चर्चेत

अनिल बाबर, भरत गोगावले, संजय रायमुलकर, अपक्ष आमदार बच्चू कडू, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक,
योगेश कदम यांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?, असं विचारलं असता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच उत्तर दिले होते.

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासूनच अपक्ष आमदार बच्चू यांचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत होतं. बच्चू कडू यांनीही याबाबत अनेकदा आपलं मत बोलून दाखवलं. दिव्यांग खात्याचा कारभार आपल्याला मिळावा, असंही ते अनेकदा म्हणाले आहेत. दरम्यान याआधीही उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये बच्चू कडू शालेय शिक्षण राज्यमंत्री होते. त्यामुळे पुन्हा संधी मिळावी, असं त्यांनी वारंवार बोलून दाखवलं. जाहीर सभांमध्येही त्यांनी आपली खंत बोलून दाखवली. आता अखेर बच्चू कडू यांना संधी मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Follow Us