अवकाळी पाऊस आता परतणार का ? काय आहे पुणे हवामान विभागाचा अंदाज

| Updated on: Mar 18, 2023 | 11:54 AM

पुणे हवामान विभागाने राज्यात पाच दिवस अवकाळी पाऊस व गारपीटीचा इशारा दिला होता. १६ ते २० मार्चसाठी हा अंदाज होता. आता नवीन अंदाज आला आहे. अवकाळी सुरु असलेला पाऊस कधी परतणार? याची माहिती दिली आहे. शेतकरी हे संकट दूर होण्याची अपेक्षा करत आहे.

अवकाळी पाऊस आता परतणार का ? काय आहे पुणे हवामान विभागाचा अंदाज
Follow us on

पुणे : राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावत सगळं जनजीवन विस्कळीत केलं आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली.यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने राज्यात पाच दिवस अवकाळी पाऊस व गारपीटीचा इशारा दिला होता. आता नवीन अंदाज काय आहे, त्याची माहिती पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस.होसालीकर यांनी दिलीय. IMD GFS मॉडेल मार्गदर्शनानुसार गंभीर हवामानाची तीव्रता हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत हलक्या ते गडगडाटासह पाउस शक्यता. आकाश अंशतः ढगाळ राहील, असे होसालीकर यांनी म्हटले आहे.

पुणे, सोलापुरात पाऊस

राज्यात पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूरसह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यातील किणी गावात गरपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही गारपीट झाली. या गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालाय. चपळगाव, बोरेगाव, हन्नूर, नागणसूर, किणी यासह अक्कलकोट तालुक्यातील विविध गावात अवकाळी पाऊस झाला आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वातावरणामध्ये होत असलेल्या बदलाने शेतकरी धास्तावला आहे. शेतात हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतात असलेल्या ज्वारी पिकाला मोठा फटाका बसला असून या वातावरात बदलाचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे.

नाशिकमध्ये नुकसान

नाशिक जिल्ह्यात रात्रीपासून विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे शेतात उभा असलेल्या गव्हाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी भुईसपाट केले आहे. रात्री झालेल्या गारपीटीमुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडलीय. पावसात कांदा, भाजीपाला सहडाळिंब, द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. यापूर्वी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाही. त्यानंतर आता नवीन संकट समोर आले आहे.

अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना घेतलेले कर्ज कसे फेडावे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न पडला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहे. त्यांनी कांद्याप्रमाणे आता द्राक्षांना ही अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे.