Pune : पुण्यात किसानपुत्रांचा आसूड कडाडणार; शेतकऱ्यांसाठी विषारी साप ठरलेल्या कायद्यांविरोधात एल्गार

| Updated on: Apr 26, 2022 | 3:10 PM

विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे (Pune) शहरात शेतकरी (Farmers) स्वातंत्र्यासाठी आता किसानपुत्रांचा (Kisanputra) आसूड कडाडणार आहे. या अनोख्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केले आहे.

Pune : पुण्यात किसानपुत्रांचा आसूड कडाडणार; शेतकऱ्यांसाठी विषारी साप ठरलेल्या कायद्यांविरोधात एल्गार
किसानपुत्र आंदोलनाचे बोधचिन्ह.
Follow us on

पुणेः विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे (Pune) शहरात शेतकरी (Farmers) स्वातंत्र्यासाठी आता किसानपुत्रांचा (Kisanputra) आसूड कडाडणार आहे. या अनोख्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केले आहे. 18 जून 1951 रोजी पहिला घटनाबिघाड करून भारतीय राज्य घटनेत नसलेले परिशिष्ट 9 जोडण्यात आले. या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आलेल्या कायद्यांच्याविरुद्ध न्यायालयात जाता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली. आज या परिशिष्टयातील 284 कायद्यांपैकी 250 कायदे थेट शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. सीलिंग, आवश्यक वस्तू आदी कायद्यांमुळे शेतकरी गुलाम बनला. आत्महत्या करू लागला. या कायद्यांना परिशिष्ट 9 चे संरक्षण आहे. हे कायदे विषारी साप आहेत आणि परिशिष्ट 9 हे या सापांचे घर आहे. संविधान विरोधी असलेले हे कायदे रद्द व्हावे, शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळावे, म्हणून किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने दरवर्षी 18 जूनला शेतकरी पारतंत्र्य दिवस पाळला जातो. त्यानिमित्त पुण्यात या दिवशी पदयात्रा काढण्यात येणार आहे.

काय केले आवाहन?

सरकारे बदलली पण शेतकरीविरोधी नरभक्षी कायदे तसेच कायम राहिले. गळफास असलेल्या कायद्यांविरुद्ध कोणी आवाज उठवीत नाही. स्वातंत्र्याचा संकोच करणारा, संविधान विरोधी परिशिष्ट-9 रद्द करण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नाही. इतिहासाने ही जबाबदारी तुमच्या आमच्यावर टाकली आहे. शेतकरी वाचवू, देश वाचवू! छोट्या कृतीतून मोठा परिणाम साधू. म्हणून 18 जून 22 रोजी होणाऱ्या पदयात्रेत सहभागी व्हा, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे मयूर बागुल, नितीन राठोड, असलम सय्यद, डॉ. राजीव बसरगेकर, अनंत देशपांडे, अॅड महेश गजेंद्रगडकर, डॉ प्रशांत शिनगारे, अमित सिंग, विश्वास सूर्यवंशी, राजेश वाघमोडे, गणेश शितोळे देशमुख (सर्व पुणे जिल्हा) आणि अमर हबीब (अंबाजोगाई), राजीव बसरगेकर (नवी मुंबई) डॉ. आशिष लोहे (अमरावती), अॅड. सुभाष खंडागळे (पुसद), सुभाष कच्छवे (परभणी), अॅड भूषण पाटील (औरंगाबाद), संदीप धावडे (वर्धा) यांनी केले आहे.

कोठून कोठे जाणार?

पुण्यात म. गांधी पुतळा, (रेल्वे स्टेशन) ते म. फुले वाडा (भवानीपेठ) अशी ही पदयात्रा निघणार आहे. या पदयात्रेत ही किसानपुत्र आंदोलनाची भूमिका मान्य असलेला कोणीही व्यक्ती सहभागी होऊ शकतो. किसानपुत्र (पुत्र-पुत्री) यांनी जरूर सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बाहेरचे लोकही या पदयात्रेत सहभागी होऊ शकतात, पण जे सहभागी होऊ शकणार नाहीत त्यांनी पुण्यातील त्यांच्या संबंधितांना फोन करून, मॅसेज करून यात सामील होण्यासाठी सांगावे, असे आवाहन केले आहे.

कोणाशी संपर्क करावा?

या पदयात्रेबाबत पुढील लोकांशी संपर्क साधावा असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यात 1) मयूर बागुल (9096210669) हे या पदयात्रेचे संयोजक आहेत. या शिवाय 2) डॉ. राजीव बसरगेकर- (7499707142) यांच्याशी बोलू शकता. किंवा 3) अमर हबीब- (8411909909) यांच्याशीही थेट संपर्क साधू शकता.

खर्चाचे काय?

जे लोक या पदयात्रेत सहभागी होण्याची पूर्व सूचना देतील, त्यांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप केला आहे. त्यात सामील करून घेतले जाईल व त्याद्वारे सूचना दिल्या जातील. किसानपुत्र आंदोलन पैसे गोळा करीत नाही. तरीही काही खर्च लागला, तर ग्रुपवर काम कळवले जाते. उपस्थित किसानपुत्रापैकी कोणी तरी त्या कामाची जबाबदारी घेतो. पार पाडतो. परस्पर खर्च करतो. किंवा दोघे चौघे मिळून खर्च करतात. कोणावरही जबरदस्ती केली जात नाही. आतापर्यंत तरी कधी काम अडलेले नाही, असेही कळवण्यात आले आहे.