पुणे महापालिकेच्या ‘अभय योजने’ला अत्यल्प प्रतिसाद, मुदत संपल्यावर होणार धडक कारवाई, कसा कराल अर्ज?

| Updated on: Aug 24, 2021 | 2:05 PM

पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागाने काही दिवसांपूर्वी अभय योजनेची घोषणा केली होती. मात्र, या योजनेला शहरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याच दिसतंय. कारण गेल्या 15 दिवसांत अनधिकृत नळ अधिकृत करण्यासाठी फक्त 18 प्रस्ताव महापालिकेकडे आले आहेत.

पुणे महापालिकेच्या अभय योजनेला अत्यल्प प्रतिसाद, मुदत संपल्यावर होणार धडक कारवाई, कसा कराल अर्ज?
पुणे महानगरपालिका
Follow us on

पुणे : शहरातल्या अनधिकृत नळजोडण्या (Unauthorized Water Connections) नियमित करण्यासाठी पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागाने काही दिवसांपूर्वी अभय योजनेची घोषणा केली होती. मात्र, या योजनेला शहरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याच दिसतंय. कारण गेल्या 15 दिवसांत अनधिकृत नळ अधिकृत करण्यासाठी फक्त 18 प्रस्ताव महापालिकेकडे आले आहेत. त्यापैकी केवळ 1 नळजोडणी नियमित करण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation’s Abhay Yojana has received very little response from the city for regularizing unauthorized water connections)

शहरात सुमारे 2 लाख अनधिकृत नळजोडण्या

शहरात सुमारे 2 लाख अनधिकृत नळजोडण्या असल्याचा अंदाज आहे. यातून मोठ्या प्रमाणात पाणीचोरी होते. सोबतच या माध्यमातून महापालिकेचा कोट्यवधींचं उत्पन्न बुडतं. शिवाय नळजोडण्या जलवाहिन्यांना चुकीच्या पद्धतीने जोडल्या गेल्या असल्याने त्यातून पाणी गळतीचं प्रमाणही जास्त आहे. या पार्श्वभूमीवर पाणी गळती थांबवावी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी अभय योजनेची सुरूवात करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनधिकृत नळजोडणी नियमित करता येणं शक्य आहे. त्यासाठी काही अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे.

मुदत संपल्यानंतर होणार कारवाई!

अभय योजनेच्या माध्यमातून शहरातल्या अनधिकृत नळ जोडण्यांना 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीमध्ये अनधिकृत नळधारकांनी शुल्क भरून आपल्या जोडण्या अधिकृत करण्याचं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे. मुदत संपल्यानंतर याविषयी कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.

अभय योजनेसाठी कसा आणि कुठे कराल अर्ज?

अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी साध्या कागदावर अर्ज करायचा आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित झोनच्या (स्वारगेट/ सावरकर भवन/ एसएनडीटी/ चतु:श्रुंगी/ बंडगार्डन/ लष्कर) कार्यकारी अभियंत्यांकडे हा अर्ज द्यायचा आहे. अर्जात अभय योजनेसाठी अर्ज करत असल्याचं नमूद करायचं आहे.

अर्जामध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहून सोबत एमएसईबी किंवा टेलिफोन बिल, आधारकार्डची प्रत, मालकीहक्काची कागदपत्रं जोडायची आहेत.

अर्ज मिळाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून जागेची पाहणी केली जाईल. त्यानंतर नियमानुसार पात्र नळजोडण्या नियमित करण्यात येतील. अपात्र जोडण्यांवर कारवाई केली जाईल. सोबतच एक इंच व्यासापेक्षा जास्त व्यासाचे नळजोडणी नियमित केले जाणार नाहीत.

संबंधित बातम्या :

पुणेकरांसाठी महापालिकेची ‘अभय योजना’, अनधिकृत नळजोडणी नियमित करण्याची सुवर्णसंधी, कसा कराल अर्ज?

PMRDA विकास आराखड्यावर साडेआठ हजार हरकती दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मुदत, कशा दाखल कराल हरकती आणि सूचना?

पुणे महानगर नियोजन समिती निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर, नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता, इथे पाहा संपूर्ण यादी