पुणे पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी धुतले नगरसेविकेचे पाय, रुपाली ठोंबरे संतापल्या, म्हणाल्या; लायकी नसलेल्या…

Rupali Thomabre : पुणे महापालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांनी भाजपच्या एका नगरसेविकेचे पाय धुतल्याचे समोर आले आहे.

पुणे पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी धुतले नगरसेविकेचे पाय, रुपाली ठोंबरे संतापल्या, म्हणाल्या; लायकी नसलेल्या...
Pune nagarsevika and rupali Thombare
Image Credit source: Google
| Updated on: Jul 31, 2026 | 5:45 PM

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महापालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांनी भाजपच्या एका नगरसेविकेचे पाय धुतल्याचे समोर आले आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबत यामुळे राजकारणही तापले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी या प्रकरणावरून संताप व्यक्त केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विद्यार्थ्याने वर्षा साठे यांचे पाय धुतले

पुण्यातल्या सुखसागर नगरमधल्या महापालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी भाजपच्या नगरसेविका वर्षा भीमराव साठे यांना बोलावण्यात आलं होते. या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून त्यांचे पाय धुवून घेण्यात आले. त्यामुळे मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी या प्रकारावर सडकून टीका केली आहे. रुपाली पाटील यांनी पुण्यातील या प्रकारावर बोलताना म्हटले की, या नगरसेविकेचं शिक्षण काय आहे? लायकी नसणाऱ्या माणसांचे पाय धुवायला लावता? शिक्षण विभागातील पण अधिकारी याला जबाबदार आहेत. नगरसेविकेने दिलगिरी व्यक्त केली पाहिजे.

नगरसेविकेला पक्षातून काढून टाका

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटले की, ‘पदावर बसत असताना तो कुठल्या लायकीचा आहे, आता यांची ढुंगण धुण्याची लायकी नाही त्यांना नगरसेवक केले. त्यांचे पाय धुण्याचे प्रकार ठेवले तर असे प्रकार होतीलच, अशा लोकांना पदावर बसवल्यावर विद्यार्थ्यांचे भविष्याशी हे खेळतील. विद्यार्थ्यांकडून पाय धुवून घेतले, या नगरसेविकेला पदावर राहण्याचा अधिकार आहे का? भाजपने त्यांना पक्षातून आणि पदावरून काढून टाकलं पाहिजे.

विरोधकांकडून चौकशीची मागणी

दरम्यान, नगरसेविका वर्षा साठे यांचे पती भीमराव साठे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. आमच्याकडून तो प्रकार अनावधानानं झाला. आमचा त्यामागे कोणताही हेतू नव्हता, शाळेत कार्यक्रम सुरू असताना नगरसेविका तिथे गेल्या होत्या, त्यावेळी हा प्रकार घडला आहे असं स्पष्टीकरण भीमराठ साठे यांनी दिलं आहे. आता शाळेत नगरसेविकेला नेमकं कोणी बोलावलं? चिमुकल्या विद्यार्थ्यांना नगरसेविकेचे पाय धुवा असं कोणी सांगितलं? नगरसेविकेनंही त्या चिमुकल्यांकडून पाय कसे धुवून घेतले? याची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us