आरटीई प्रवेशाचे मेसेज कधी येणार? प्रवेश प्रक्रियेसाठी काय लागणार?

राज्यातील ज्या शाळांनी आरटीईतंर्गत नोंदणी केली होती, त्या शाळांमधील प्रवेशासाठी २५ मार्चपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. त्यासाठी लॉटरी काढण्यात आली आहे. आता पालक मेसेज येण्याची वाट पाहत आहे. मेसेज सोबत पालकांनी ही खबरदारी घेण्याची गरज आहे.

आरटीई प्रवेशाचे मेसेज कधी येणार? प्रवेश प्रक्रियेसाठी काय लागणार?
आरटीई लॉटरी
Jitendra Zavar | Updated on: Apr 08, 2023 | 7:16 AM

पुणे : शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RTE च्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत बुधवारी निघाली निघाली आहे. यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेतंर्गत आपल्या मुलाच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची प्रतीक्षा संपली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन सोडत निघाली. आता या प्रवेशाचे मेसेज कधी येणार याची वाट पाहिली जात आहे. राज्यातील ८ हजार ८२८ शाळांमधील १ लाख १ हजार ९६९ जागांसाठी ३ लाख ६४ हजार ४७० पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज भरले होते.

कधी येणार मेसेज

राज्यातील ज्या शाळांनी आरटीईतंर्गत नोंदणी केली होती, त्या शाळांमधील प्रवेशासाठी २५ मार्चपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. निवडीसाठी पात्र ठरलेल्या अर्जाची सोडत बुधवारी काढली. त्यानंतर पालक मेसेजची वाट पाहत आहेत. प्रवेशासाठी निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजतापासून मेसेज पाठविले जाणार आहेत.

मेसेजवर अवलंबून राहू नये…

आरटीईतंर्गत प्रवेशासाठी निवड झालेल्या पात्र मुलांची यादी लवकरच होणार आहे. पात्र ठरलेल्या मुलांना मेसेज येणार आहे. अर्ज भरताना जो मोबाईल क्रमांक दिला, त्यावर मेसेज येणार आहेत. परंतु पालकांनी केवळ मेसेजची वाट पाहू नये, संकेतस्थळावर भेट देऊन निवड यादीपाहून प्रवेशाची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले.

यंदा अर्जांची संख्या मोठी

यंदा अर्ज संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. राज्यातील ८ हजार ८२८ शाळांमधील १ लाख १ हजार ९६९ जागांसाठी ३ लाख ६४ हजार ४७० पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज भरले होते. लॉटरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल. आरटीई अंतर्गत आर्थिक आणि वंचित घटकांतील मुलांचे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबवण्यात येत असल्याचे प्रधान सचिव रणजित देओल यांनी सांगितले.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी रहिवाशी दाखला, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला( खुल्या प्रवर्गासाठी), जन्माचा दाखला, अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेअंतर्गत प्रवेश दिला जातो.

पुणे जिल्ह्यातून यंदा सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावं लागणार आहे. प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळवली जाणार आहे.प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीमध्ये पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश निश्चित करावा, असेही आवाहन संचालनालयाने केले आहे.

Follow Us