Mahadev Jankar : अविश्वास दाखवणं योग्य नाही, नवं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल; रासपच्या महादेव जानकरांना विश्वास

पाऊसपाणी चांगला व्हावा, रोगराई होऊ नये, असे विठ्ठलाला साकडे घालण्यासाठीच आपण पंढरपूरला जात आहोत. राष्ट्रीय समाज पक्षालाही दिवस चांगले येवो, असे महादेव जानकर म्हणाले.

Mahadev Jankar : अविश्वास दाखवणं योग्य नाही, नवं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल; रासपच्या महादेव जानकरांना विश्वास
रासपची शिवसेना होण्याच्या मार्गावर, महादेव जानकरांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी, कार्यकर्ते म्हणतात पक्ष आमचाच
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 07, 2022 | 4:13 PM

इंदापूर, पुणे : काल परवाच शिंदे-भाजपा सरकारचा शपथविधी झाला आहे, त्यांच्यावर लगेच गैर विश्वास दाखविणे योग्य नाही. या सरकारला काम करण्याची संधी दिली पाहिजे, त्यांची विकासकामे आपण पाहिली पाहिजेत, असे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केले आहे. ते इंदापुरात बोलत होते. महादेव जानकर हे इंदापूर होऊन अकलूजच्या दिशेने जात असताना इंदापूर (Indapur) शहरात ते काही वेळ थांबले होते. इंदापूर शहरातील अकलूज चौक येथील विठ्ठलाच्या मूर्तीचे त्यांनी यावेळी दर्शन घेतले. पुढे अकलूजमार्गे पंढरपूरला ते जाणार होते. यावेळी इंदापूर तालुक्यातील सुरवड या गावी एका पालखीच्या दिंडीत (Dindi) ते सहभागी झाले. यावेळी मृदंगाच्या तालावरती टाळ वाजवीत पांडुरंगाच्या भक्तीत ते लीन झाले.

‘न्यायनिवाडा जनतेतून होईल’

नुकतेच राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आले आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपा सरकारवर लगेच टीका करणे योग्य होणार नाही. त्यांना वेळ द्यायला हवा. त्यांची विविध कामे पाहिली पाहिजेत. जो काही न्यायनिवाडा होईल तो जनतेतून होईल, असे ते म्हणाले. हे सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा आपल्याला विश्वास असल्याचे मतदेखील माजी मंत्री आणि रासपच्या या नेत्याने व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आपला पक्ष त्यांच्यासोबत राहील, असेही यावेळी महादेव जानकर यांनी सांगितले.

‘विठ्ठलाला साकडे घातले’

पाऊसपाणी चांगला व्हावा, रोगराई होऊ नये, असे विठ्ठलाला साकडे घालण्यासाठीच आपण पंढरपूरला जात आहोत. राष्ट्रीय समाज पक्षालाही दिवस चांगले येवो, असे ते म्हणाले. यावेळी पायी दिंडीत मृदंगाच्या साथीने टाळ वाजवत विठुरायाच्या भक्तीत ते लीन झालेले पाहायला मिळाले. दरम्यान, तीन दिवसांवर आषाढी एकादशी येवून ठेपली आहे. वारकरी पंढरीच्या जवळ पोहोचले आहेत. रविवारी हा सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त पंढरीत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. जानकरदेखील पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला निघाले आहेत.