Uddhav Thackeray : शिवसेनेचं हिंदुत्व आता ओळखायचं कसं? गिरीश कुबेरांच्या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर दिलं

| Updated on: May 01, 2022 | 1:37 PM

आमचे अस्तित्व आहे, हे ज्यांना दाखवावे लागते, त्यांना ते दाखवू द्या. त्यांचा तो अधिकार आहे. कधी मशिदीतून बाहेर पडतानाचे फोटो आहेत, कधी मराठी माणसांसोबतचे फोटो आहेत, कधी हिंदुंसोबतचे फोटो आहेत. मी कशाला लक्ष देऊ, असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

Uddhav Thackeray : शिवसेनेचं हिंदुत्व आता ओळखायचं कसं? गिरीश कुबेरांच्या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर दिलं
हिंदुत्वावरून राज ठाकरेंवर टीका करताना उद्धव ठाकरे
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : शिवसेना हिंदुत्ववादी (Hindutva) पक्ष आहे. शिवसेनेचे हिंदुत्व ओळखण्याची गरजच नाही. शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते हिंदुत्व आमचा श्वास आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मांडत विरोधकांसह राज ठाकरेंचा समाचार घेतला. लोकसत्ताचे संपादक गिरीष कुबेर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली, त्यात त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्ष केला. यावेळी शिवसेनेचे हिंदुत्व ओळखायचे कसे, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की आम्हाला सारखा हिंदुत्वाचा डंका वाजवावा लागत नाही. का तुम्हाला तुमची ओखळ सांगावी लागते, का तुम्हाला तुमचे झेंडे (Flag) फडकवावे लागतात? कधी या रंगाचा तर कधी त्या रंगाचा झेंडा. आमचा झेंडा आम्ही कधीही बदलला नाही, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.

‘अस्तित्व दाखवावे लागते, तो त्यांचा अधिकार’

आमचे अस्तित्व आहे, हे ज्यांना दाखवावे लागते, त्यांना ते दाखवू द्या. त्यांचा तो अधिकार आहे. कधी मशिदीतून बाहेर पडतानाचे फोटो आहेत, कधी मराठी माणसांसोबतचे फोटो आहेत, कधी हिंदुंसोबतचे फोटो आहेत. मी कशाला लक्ष देऊ, असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. आता मार्केटिंगचा जमाना आहे. नाही पसंत पडले तर परत करा. फळले तर फळले नाही तर परत. हे असेच भोंगेधारी पुंगीधारी खूप बघितलेत. आम्ही मराठी मग बाकीच्यांना हकलून द्या, मग ते फसले की आम्ही हिंदू. इतरांना घरात बोलवायचे. हे जे चाळे चालतात त्यांना माकड चाळे म्हणतात. महाराष्ट्रातील जनता नासमज नाही, असा हल्ला त्यांनी राज यांच्यावर चढवला.

भोंग्यांचा मुद्दा गौण

नोटाबंदी, लॉकडाऊन देशभर केली तशी भोंगाबंदी देशभर करा, असे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केली आणि भोंग्यांवरून राजकारण करणाऱ्यांना चपराक लगावली. भोंग्यांचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे. न्यायालयाने निकाल दिल्यानुसार भोंगे सुरू आहेत. त्यामुळे भोंग्यांचा विषय गौण असून विकास हा मुद्दा आमच्यासमोर महत्त्वाचा आहे.

‘अस्मिता टिकवण्याची गरज’

हिंदुत्वाच्या दावेदार या शब्दावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, की शिवसेना आणि हिंदुत्वाचा दावेदार मुळात दावेदार हा शब्दच चुकीचा आहे. हिंदुंना असमर्थ किंवा नासमज समजू नका. त्यांना सर्व कळते. हिंदु म्हणजे कोण परदेशातून आलेले नाहीत. आपल्याकडे हिंदू अनेक भाषा बोलतात. प्रत्येकाची अस्मित आहे. ती टिकवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.