
रायगड तालुक्यातील उरणमध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. उरणच्या चिरनेर गावात कुक्कुटपालन उरणमधील चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसायिकांच्या कोंबड्यांचा गेल्या काही दिवसांपासून मृत्यू होत आहे. याबद्दल शासनाच्या पशू पालन अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी काही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले. यामुळे उरण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट केली आहेत. तसेच याबद्दलची पुढील कारवाई केली जात आहे.
उरणमधील चिरनेर गावात अनेक नागरिक हे कुक्कुटपालन हा व्यवसाय करतात. मात्र काही दिवसापासून या गावातील कोंबड्या मृत पावत होत्या. यामुळे व्यावसायिकांना संशय आला. त्यामुळे काहींनी शासनाच्या पशू पालन अधिकाऱ्यांना याबद्दलची माहिती दिली. त्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असता काही कोंबड्यांची तपासणी करण्यासाठी भोपळा आणि पुणे येथे पाठवले. यावेळी काही वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर काही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
यानंतर आता चिरनेर परिसरातील 10 किलोमीटर अंतरावर सर्व गावांना आपल्याकडील कोंबड्या आणि त्यापासून मिळालेली अंडी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच गावात जाऊन पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अशा हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट केली आहेत. सध्या याबद्दलची पुढील कारवाई सुरू आहे. त्यामुळे कुक्कुट पालन करणाऱ्या व्यावसायिकांवर संक्रात आली आहे.
याबद्दल अधिक दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र बर्ड फ्ल्यू सारखा रोग आल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असेही आवाहन शासन प्रशासनाकडून केले जात आहे. याबद्दल केंद्र सरकारकडून जवळपास 10 टीम तैनात करण्यात आल्या होत्या. या टीमकडून संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी आणि इतर उपाययोजना केल्या आहेत. पुढील तीन महिने संपूर्ण परिसरावर देखरेख करणारी टीम कार्यरत केली जाणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पोल्ट्री व्यवसाय चिंतेत असून आमच्या नष्ट केलेल्या कोंबड्यांची भरपाई योग्य आणि तात्काळ मिळावी अशी मागणी यावेळी व्यावसायिकांकडून केली जात आहे.
उरण तालुक्यातील कोंबड्यांना बर्ड फ्लुची लागण झाल्याने खबरदारी म्हणून गावातील 1 हजाराहून अधिक कोंबड्या तसेच अंड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. तसेच 1 किलोमीटर पर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरातील चिकनची दुकाने 9 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.