BIG NEWS | रायगडमधील 6 पैकी 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

रायगड जिल्ह्यात सहा पैकी चार नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. विशेष म्हणजे पाऊस थांबायचं नाव घेताना दिसत नाहीय. त्यामुळे चिंता वाढली आहे.

BIG NEWS | रायगडमधील 6 पैकी 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 20, 2023 | 12:12 AM

रायगड | 19 जुलै 2023 : रायगड जिल्ह्यात प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. हा पाऊस जणू काही वैरी होऊनच कोसळतोय की काय? अशी भीती आता जिल्ह्यातील नागरिकांना वाटू लागली आहे. कारण मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 6 पैकी तब्बल 4 नद्यांच्या पाणी पातळीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. विशेष म्हणजे पाऊस अजूनही धुवांधारपणे कोसळतोय. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. रायगड जिल्हा माहिती कार्यालयाकडून ट्विटरवर याबाबतची सविस्तर माहिती जारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका आणि पातळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. याशिवाय पाऊस असाच पडत राहिला तर उल्हास नदीदेखील इशारा पातळी ओलांडू शकते.

राज्यभरात प्रचंड पाऊस

महाराष्ट्रात आज दिवसभरात प्रचंड पाऊस पडलाय. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जळगाव जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत आज रेल्वे सेवा देखील ठप्प झाली. याशिवाय एका आईला कल्याण-ठाकुर्ली दरम्यान आपल्या सहा महिन्याच्या लेकीला गमवावं लागलं आहे. अतिशय मन हेलावणारा हा प्रसंग आहे.

राज्यात पावसाचा हा ओघ असाच सुरु राहिला तर पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. प्रशासनाकडून सर्व काळजी घेतली जात आहे. पावसाने आता काही काळ तरी उसंत घ्यावा, अशी प्रार्थना सर्वसामान्य नागरीक देवाकडे करत आहेत, जेणेकरुन पाणी काहीसं ओसरेल.

हवामान विभागाने पुढचे 24 तास हे महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय, तर काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज असर्ट जारी केला आहे. हवामान विभागाकडून पालघर, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.