राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, कोण, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता

unseasonal rain | नागपूरसह परिसरात आज वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. नागपूरला आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, कोण, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता
Jitendra Zavar | Updated on: Feb 26, 2024 | 8:58 AM

नागपूर, दि. 26 फेब्रुवारी 2024 | राज्यातील शेतकऱ्यांपुढील संकट कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. रब्बी हंगाम काढण्याची वेळ असताना अवकाळी पावसाचे संकट आले आहे. राज्यात तीन दिवस यलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येणार आहे. रब्बी हंगाम काढणीची वेळ आली असताना गारपीट आणि पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने आजपासून तीन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे.

विदर्भात आज पावसाची शक्यता

नागपूरसह परिसरात आज वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. नागपूरला आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे. राज्यातील अनेक भागांत थंडीत अचानक वाढ झाली आहे. तसेच पारा सरीसरीपेक्षा २ ते ४ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यात यलो अलर्ट

२६ फेब्रुवारी रोजी नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. नागपूरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. २७ फेब्रुवारी रोजी वर्धा, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. वाशिम, अकोला, यवतामाळ, बुलढाणा, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यास यलो अलर्ट २७ फेब्रुवारी रोजी दिला आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील पारा घसरला

जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशासह उत्तरेकडील देशांमध्ये होत असलेल्या हिमवर्षावामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे अचानक नाशिक जिल्ह्यातील पारा घसरला आहे. निफाडचा किमान तापमानाचा पारा घसरला आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. अचानक थंडीमध्ये वाढ झाल्याने उन्हाळ्याच्या तोंडावर शेकोट्या पेटल्या चित्र पाहवयास मिळत आहे. अचानक थंडीमध्ये वाढ झाल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. फुगवणीला आलेल्या व काढणी चालू असलेल्या द्राक्षांना तडे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Follow Us