
चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. पण त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे त्यांचा महापौर बनणं स्वाभाविक होतं. पण इथे उलटं घडलं. चंद्रपूरमध्ये काँग्रेसऐवजी भाजपचा महापौर निवडून आला. भाजपला सुद्धा बहुमताच्या आकड्याची जुळवाजुळव करावी लागली. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपला मदत केल्याची चर्चा आहे. त्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रतिक्रिया दिली आहे. “चंद्रपूर मध्ये सव्वावर्ष महापौर पद मिळत आहे, त्यासाठी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना शुभेच्छा. स्थानिक निर्णय घेण्याचा अधिकार राज ठाकरे यांनी जसा दिला होता, तसचं उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या स्थानिक लोकांना अधिकार दिला म्हणून तो निर्णय घेतला असेल. कोणीही प्रत्येक वेळेला आकांडतांडव करण्याच्या आधी दहा वेळ विचार करायला हवा. आपण जे करतो ते योग्य करतोय की नाही याचा” असं संदीप देशपांडे चंद्रपूर महापौर पदावर बोलले.
“भाषा हा अस्मितेचा विषय आहे. भाषेच्या अस्मितेवर जगात युद्ध झाली. बांग्लादेश आणि पाकिस्तान हे दोन्ही मुस्लिम देश होते, तरी भाषेच्या अस्मितेवर दोघेही वेगळे झाले. श्रीलंका संघर्ष आणि रशिया-युक्रेन अशा सगळीकडे भाषेच्या अस्मितेवर लढाई सुरू आहे. मोहन भागवत यांचे विचार कदाचित वेगळे असू शकतात. याचा अर्थ दुसऱ्यांचे विचार चुकीचे असतील हे म्हणणं योग्य नाही” असं संदीप देशपांडे म्हणाले.
कन्जेशन टॅक्स मुंबई मध्ये महापालिकेने लावला पाहिजे
“कुठल्याही गोष्टीवर आकांततांडव करायचा असेल तर दहा वेळा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आम्हाला त्याचा कुठलाही त्रास नाही त्यांना सव्वा वर्ष का होईना महापौर पद मिळालं यासाठी दोघांचे अभिनंदन” असं संदीप देशपांडे म्हणाले. “ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, तिकडे रोड टॅक्स पेक्षा कन्जेशन टॅक्स मुंबई मध्ये महापालिकेने लावला पाहिजे. डिलिव्हरी ॲप्समुळे कन्जेशन वाढलेलं आहे. यामुळे संबंधित कंपन्यांवर कन्जेशन टॅक्स लावला पाहिजे आणि त्यामधून येणाऱ्या फंडामध्ये पार्किंग लॉट पण राहिले पाहिजे” असं संदीप देशपांडे म्हणाले.
आम्हाला नितेश राणे सारख्या लोकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही
“आम्ही सगळ्या विषयांवरती बोलतो नितेश राणेला कदाचित हे माहिती नाही. आमचे हिंदुत्व काय आहे आणि काय नाही आम्ही हे वेळोवेळी दाखवलेलं आहे. आम्हाला नितेश राणे सारख्या लोकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही” असं संदीप देशपांडे म्हणाले.