Raj Thackeray : औरंगाबादमधील राज यांच्या सभेसाठी पोलिसांच्या अटी आणि शर्थी

राज ठाकरे यांनी एक मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा घेणार असल्याची घोषणा केलीय. या सभेसाठी पोलिसांनी काही अटी आणि शर्थी मनसेसमोर ठेवल्याचे समजते. औरंगाबादमधल्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे.

Raj Thackeray : औरंगाबादमधील राज यांच्या सभेसाठी पोलिसांच्या अटी आणि शर्थी
औरंगाबादमध्ये 1 मे रोजी राज ठाकरे यांची सभा होणार आहे.
Image Credit source: twitter
| Edited By: | Updated on: Apr 28, 2022 | 10:29 AM

औरंगाबादः शिवतीर्थावर पाडव्यादिवशी घेतलेल्या सभेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राजकीय वातावरण ढवळून काढले. त्याचे फटाके अजूनही राज्यभर फुटतायत. शिवाय आगामी महापालिका निवडणुका पाहता त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे चर्चेत राहणार आहेत. तोच राज ठाकरे यांनी एक मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा घेणार असल्याची घोषणा केली. या सभेसाठी पोलिसांनी काही अटी आणि शर्थी मनसेसमोर ठेवल्याचे समजते. औरंगाबादमधल्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेसाठी लाखभर लोक सहज उपस्थित राहू शकतात. राज यांना ऐकण्यासाठी अख्खा मराठवाड्यातील लोक येथे येऊ शकतात. हे गृहीत धरून संपूर्ण शहरभर पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. सभास्थळ मैदानावर दोन दरवाजातून प्रवेश दिला जाणार आहे. सभेसाठी रॅली, मिरवणुका काढण्यावर बंदी असणार आहे.

हे रस्ते राहणार बंद

राज यांच्या सभेसाठी जिल्हा परिषद मैदान, मिलिंद कॉलेज मैदान आणि पंचवटी मैदानावर पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. यावेळी भडकाऊ आणि चिथावणीखोर घोषणा देण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. औरंगाबादमधील मिल कॉर्नर ते औरंगपुरा आणि भडकल गेट ते महापालिका कॉर्नर आणि खडकेश्वर ते भडकल गेट हे रस्ते बंद राहणार आहेत. संवेदनशील परिसरात पार्किंग आणि रॅलीसाठी पूर्णपणे बंदी असेल. शहरातील सर्वात मोठ्या आमखास मैदानावरही पार्किंगसाठी बंदी असणार आहे. सभास्थानी सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील. मुस्लीम बहुल पट्ट्यातील रहदावरीवर बंदी असणार आहे. शिवाय मशीद आणि इतर धार्मिक शाळांसमोर घोषणाबाजी आणि रॅलीवरती पोलिसांची कडक नजर असेल.

हे नियम पाळावे लागणार

राज ठाकरे यांच्या सभेत ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे लागतील. लहान मुले, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी लागेल. इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल. सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्याने धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी. सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये. वाहन पार्किंगचे नियम पाळावेत. सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही. सभेला येणार्‍या लोकांनी घोषणा देऊ नयेत. सामाजिक वातावरण, सलोखा बिघडेल असे कुठलेही वर्तन तयार करण्यात येऊ नये, यासह आणखी काही अटी सभेला लागू रहाणार आहेत.