
महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सध्या राज्य आयसीयूमध्ये (ICU) आहे. कोणतीही गोष्ट कायमस्वरुपी नसते, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सत्तेवर जोरदार टीका केली. मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित मनसेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीचा रोडमॅप सांगताना सत्ताधाऱ्यांना एक्सपायरी डेटची आठवण करून दिली.
राज ठाकरे यांनी नुकतंच मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांबद्दल परखड मत मांडले. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. या बैठकीला मनसे नेते संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, अविनाश अभ्यंकर, गजानन काळे, अमेय खोपकर आणि अमित ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.
आजची महाराष्ट्रातील जी सर्व परिस्थिती आहे. महाराष्ट्र हा सध्या आता आयसीयूमध्ये आहे. सध्या जी काही परिस्थिती आहे, त्याला आपण बाळसं म्हणू शकत नाही. त्याला आपण सूज म्हणू शकतो. ही इतकी विचित्र घाणेरडी सूज आहे की ज्यात अनेकांना असं वाटतं की जे काही सुरु आहे हे कायमस्वरुपी आहे. कायमस्वरुपी काहीही नसतं, असे राज ठाकरे म्हणाले.
सलमान खानचे वडील सलीम खान नेहमी सांगतात की प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असते. त्यामुळे आता जे सत्तेत आहेत, त्यांना एक्सपायरी डेट असणारच आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट कायमस्वरुपी नसते, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
काँग्रेस जेव्हा सत्तेत होती तेव्हा अनेकांना असं वाटत होतं की काँग्रेसला कोण हलवणार, पण ती हलली. साधारण ५७ ते ५८ वर्ष ज्यांनी या देशावर राज्य केलं, तो पक्ष आज तुम्हाला चाचपडताना दिसतोय, तीच परिस्थिती यांचीही होणार हे निश्चित आहे. होणार म्हणजे होणार यात काही दुमत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तुम्ही अनेक आंदोलन केले आहेत. मात्र आता यापुढे फक्त निवडणुकीवर लक्ष द्या. आपल्याला प्रत्येक जिल्ह्यासाठी संपर्क प्रमुखांची निवड करायची आहे. पक्षाचा कार्यक्रम निवडणूक हाच आहे. आता पुढची 3 वर्ष निवडणूक नाही, त्यामुळे आता पक्ष बांधणीला सुरुवात करा. तसेच येत्या २७ फेब्रुवारी रोजी येणारा मराठी भाषा दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करा, असे आदेश त्यांनी दिले आहेत.