
Rajya Sabha Election : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा आहे. येत्या 16 मार्च रोजी महाराष्ट्रातील सात जागांसाठी एकूण 10 राज्यांतील 30 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सध्याचे संख्याबळ लक्षात घेता महायुतीचे सहा आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून या निडणुकीसाठी राजकीय गणित जुळवण्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू होत्या. दरम्यान, आता भाजपाने आपल्या चार उमेदवारांचे नाव जाहीर केले आहे. खासदार शरद पवार हे पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. हीच शक्यता लक्षात घेता आता राज्यातील सातही जागा बिनविरोध होण्याची शक्यात व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विजयाचे आणि मतांचे गणित काय आहे? हे समजून घेऊ या…
भाजपाने आपल्या चार उमेदवाराची नावे जाहीर केली आहेत. या यादीमध्ये माजी मंत्री विनोत तावडे, आरपीआय (आठवले गट) पक्षाचे प्रमुख तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपाचे हिंगोलीत नेते रामराव वडकुते, नागपूरच्या भाजपाच्या नेत्या माया इवनाते यांचे नाव आहे. प्रत्येक एक जागा ही अजितदादांच्या राष्ट्रवादीला तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीचा एक उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो. या जागेसाठी शरद पवार यांचे नाव जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे. याआधी राज्यसभेची जागा आम्हाला द्यावी, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. काँग्रेसकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती.
सातव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवार यांचे नाव जाहीर झाले तर ही निवडणूक बिनविरोध करण्याची भाजपाची तयारी असल्याचे बोलले जात आहे. परंतु महाविकास आघाडीने ठाकरे गट किंवा काँग्रेस या पक्षातील नेत्यांना उमेदवारी दिली तर भाजपादेखील सातव्या जागेसाठी उमेदवार देऊ शकते, असे सांगितले जातेय. उमेदवार निवडून येण्यासाठी पहिल्या सपंतीच्या 37 मतांची गरज आहे. महायुतीचे संख्याबळ 232 आहे. शिंदे गटाकडे 20 मते तर अजित पवार यांच्या पक्षाकडे तीन मते अतिरिक्त आहेत. त्यामुळे ऐनवेळी मतांची जुळवाजुळव करून भाजपा सातव्या जागेसाठी ताकद लावण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु आता सातव्या जागेसाठी शरद पवार यांचेच नाव निश्चित झाल्याने सातवी जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे.