रामदास आठवले यांच्या भाजपकडे 3 मोठ्या मागण्या, अन्यथा रिपाई मोठा निर्णय घेणार?

| Updated on: Jun 06, 2023 | 5:41 PM

रामदास आठवले यांनी भाजपकडे 3 मोठ्या मागण्या केल्या आहेत. त्यावर भाजप काय प्रतिसाद देतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी काळात लोकसभा आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तसेच लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तारही होणार आहे. या सर्व घडामोडी पाहता रामदास आठवले यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

रामदास आठवले यांच्या भाजपकडे 3 मोठ्या मागण्या, अन्यथा रिपाई मोठा निर्णय घेणार?
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपकडे तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत. देशात पुढच्यावर्षी लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर काही महिन्यांनी लगेच राज्यातील विधानसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी मोठी मागणी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांच्या रिपाई पक्षाला 3 जागा हव्या आहेत. तर विधानसभेसाठी रामदार आठवले यांनी 15 जागा मागितल्या आहेत.

रामदास आठवले यांनी आणखी एक मोठी मागणी केली आहे. राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाई पक्षाला एक जागा मिळावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले यांच्या या मागणीवर भाजप काय निर्णय घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. भाजपने रामदास आठवले यांची मागणी पूर्ण केली नाही तर ते युतीतून बाहेर पडतील का? की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आठवले यांची समजूत काढण्यास यश येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?

“केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आमच्या पक्षाला केंद्रीय मान्यता आणि चिन्हाला मान्यता मिळवायची असेल तर 2 जागांवर तरी निवडून यायला पाहिजे. यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून दोन ते तीन जागा मिळवण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला दहा ते पंधरा जागा मिळाव्यात. त्यामुळे तितक्या जागा मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहील”, असं आठवले यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

‘राज्यात रिपाईला एक मंत्रिपद मिळावं’

“महाराष्ट्र सरकार चांगले निर्णय घेत आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात आरपीआयला संधी मिळावी अशी मागणी आम्ही देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. त्यांनी त्यावर विचार करू, असं सांगितलंय. महामंडळात देखील पक्षाला संधी मिळाली पाहिजे. राज्यातील महायुती सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. त्यामुळे 2024 मध्ये आम्हाला चांगलं यश मिळेल. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही युतीसोबतच असणार आहोत. आम्हाला चांगल्या जागा मिळाल्या पाहिजेत”, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

राज्याला लवकरच 14 मंत्री मिळणार?

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे या विस्तारात फक्त 14 जणांना संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 7 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. तर उर्वरित विस्तार हा ओक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होणार आहे.