मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रक्तातच संघाची विचारधारा?; भाजपच्या नेत्याचं सर्वात मोठं विधान

| Updated on: Dec 20, 2023 | 12:35 PM

भाजप आणि शिंदे गटाच्या आमदार तसेच मंत्र्यांचं काल संघाच्या शाखेत बौद्धिक शिबीर पार पडलं. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघ कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी संघ संस्थापक हेडगेवार यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघाच्या कार्यालयात आले होते, पण उपमुख्यमंत्री अजित पवार संघाच्या कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रक्तातच संघाची विचारधारा?; भाजपच्या नेत्याचं सर्वात मोठं विधान
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 20 डिसेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाऊन संघाचे संस्थापक हेडगेवार यांना अभिवादन केलं. मात्र, अजितदादा गटाचा एकही आमदार संघ कार्यालयाकडे फिरकला नाही. त्यावरून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रक्तातच संघाची विचारधारा आहे, असा दावा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरेकर यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

आमदार प्रवीण दरेकर मीडियाशी संवाद साधत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघ कार्यालयात आले, पण उपमुख्यमंत्री अजित पवार हे संघाच्या कार्यालयात आले नाही. त्याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आलं. त्यावर बोलताना दरेकर यांनी हे मोठं विधान केलं. मुख्यमंत्री त्याच विचारधारेतून आले आहेत, त्यामुळे ते संघाच्या कार्यालयात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाच्या विचारधारेतून आले आहेत. हिंदुत्ववादी विचारधारेच्या अशा अनेक संस्थांच्या ठिकाणी मुख्यमंत्री अनेकदा जाऊन नतमस्तक झाले आहेत. या विचारधारेशी समरस झाले आहेत. त्यांच्या रक्तातच संघाची विचारधारा आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले. अजित पवार का संघाच्या कार्यालयात का आले नाही हे त्यांनाच विचारा. त्यांच्या आमदारांना विचारा. त्यांनी येऊन दर्शन घेऊन ऊर्जा घ्यायला हरकत नव्हती. दर्शन घेतलं म्हणजे आचारविचार गुंडाळून ठेवले असं होत नाही. आले असते तर चांगलेच झालं असतं. वाईट झालं नसतं, असंही ते म्हणाले.

विरोधकांच्या कानात बोळे

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीच ठेप लावल्याची टीका विरोधकांनी केली होती. त्याचाही दरकेर यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांच्या कानात बोळे लावले आहेत. टेप काय उद्या त्यांच्या कानाला मोठा भोंगा लावला तरी त्यांना काही फरक पडणार नाही. झोपलेल्यांना जागं करता येतं, विरोधी पक्ष हा झोपेचं सोंग घेतलेला सोंगड्या आहे. काय बोलावं? कशावर बोलावं? हे त्यांना कळतच नाही. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे स्पष्ट आहेत. पूर्वी पुरावे आणि नोंदीसाठी जी कागदपत्रे लागायची. त्यात 15 ते 20 डॉक्युमेंटची अधिकची भर टाकली आहे. त्यामुळे जास्तीच्या नोंदी होणार आहेत. मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करून येणाऱ्या अधिवेशनात आरक्षण देऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यात काहीच हाताला लागलं नाही असं कसं. ही विरोधकांची नौटंकी आहे, असा हल्ला त्यांनी चढवला.

तर एक ठराव केला असता

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असल्याकडेही त्यांचं लक्ष वेधलं. त्यावर, मला वाटतं त्यांची समाजासाठीची आग्रही भूमिका गैर नाही. पण सरकार म्हणून कायद्याच्या चौकटीत आणि कोर्टात टिकेल असं आरक्षण द्यायचं आहे. नाही तर काही तरी केल्याचं दाखवायचं म्हणून सरकारने एक ठराव केला असता. ऑर्डिनन्स काढलं असतं. मुख्यमंत्री धाडसी आहेत. पण मराठा समाजाची दिशाभूल करायची नाही हे सरकारने ठरवलंय. त्यांना फसवायचं नाही. जे काही द्यायचं ते काँक्रिट द्यायचं. संविधानाच्या चौकटीत द्यायचं. म्हणून उशीर होतोय. उशीर झाला तरी मराठा समाजाला आरक्षण देणारच. थोडावेळ होईल. जरांगे यांनी थोडं समजून घेणं गरजेचं आहे. संयम बाळगण्याची गरज आहे, असं दरेकर म्हणाले.