माझ्यासारख्या मुसलमानाचा बिस्मिल्ला करू नका; अब्दुल सत्तार असं का म्हणाले?

आतापर्यंत शेतकऱ्यांना 12 हजार कोटी दिले आहेत. पीकविमा 51 लाख मागितला. 49 लाख शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला. 10 हजार कोटींची पोखरा-2 ही योजना तीन महिन्यात लागू करणार आहे, असं सत्तार याांनी सांगितलं.

माझ्यासारख्या मुसलमानाचा बिस्मिल्ला करू नका; अब्दुल सत्तार असं का म्हणाले?
abdul sattar
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 27, 2023 | 9:07 AM

संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये काल पार पडलेल्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात चांगलीच टोलेबाजी रंगली. जळगाव आणि जालन्याला रेल्वे मार्ग दिल्याबद्दल मी रावसाहेब दानवे यांचे आभार मानतो. रावसाहेब दानवे आणि मी सोबत असलो की अडचण येत नाही. दानवेंना यावेळी सिल्लोडमधून डबल लीड देणार आहे. राजकारणाचे काही डावपेच मी रावसाहेब दानवे पाटील आणि काही डावपेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून शिकलो. पण दोन्ही पाटलांनी माझ्यासारख्या मुसलमानाचा बिस्मिल्ला करू नये, असा चिमटा अब्दुल सत्तार यांनी काढला. त्यामुळे एकच खसखस पिकली.

या मेळाव्यानंतर अब्दुल सत्तार यांनी मीडियाशी संवाद साधला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर त्यांनी थेट भाष्य केलं नाही. पण सूचक विधान केलं. मी हनुमानासारखा त्यांचा भक्त असतो तर माझी छाती चिरून दाखवली असती. माझ्या हृदयात विखे पाटील आहेत. विखे पाटील साहेब आहेत…आता एकनाथ शिंदे आहेत. आज एकनाथ शिंदे यांनी त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. महसूल खातं त्यांना दिलं आहे. या खात्यामार्फत महत्त्वाची कामे होऊ लागली आहेत, असं सांगतानाच आपला मित्र पुढे जावा असं कोणाला वाटणार नाही? त्यांनी उच्च पदावर जावं. पण त्यांना अडचण होईल असा कोणताही प्रश्न तुम्ही विचारू नका, असं आवाहन अब्दुल सत्तार यांनी केलं.

कामाला गती मिळाली

आमचे सरकार आले आणि राज्याला गती मिळाली. आम्ही ज्या मागण्या केल्या त्या लगेच मंजूर करून निधीही दिला. पायाभूत सुविधा हेच आमच्या सरकारचे कर्तव्य आहे. 1 रुपयामध्ये शेतकरी विमा होईल असे जाहीर केले. या घोषणेची काहींनी टिंगल केली. मात्र त्याला देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारने मंजुरी दिली. असा निर्णय घेणारे देशातील आपले पहिले राज्य आहे, असं सत्तार म्हणाले.

भरपाई लवकरच देणार

प्राथमिक शिक्षणात कृषी शिक्षण राज्यात लागू करण्यात आलं. येत्या शैक्षणिक वर्षात हा नवीन विषय लागू होणार आहे. त्यामुळे चांगले शेतकरी निर्माण होतील. गोपिनाथ मुंडे अपघात विमा दोन लाखाचा आहे. हा विमा मिळायला वेळ जात होता. त्यात सुधारणा केली. आता गावातील कृषी अधिकारी आणि पोलिसांनी निर्णय घेतला की आता पैसे मिळतील, असं सांगतानाच अवकाळी आणि गारपीटीने झालेल्या नुकसानीची लवकरच भरपाई देणार आहे, असं त्यांनी सांगितलं.