Sangali: विधवा महिलांना सुवासिनींच्या पंगतीत मानाचं पान, सांगलीतील स्वप्नपूर्ती संघाचा कौतुकास्पद उपक्रम
विधवा म्हणून समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या महिलांना सुवासिनींच्या पंगतीला सन्मान देण्याचा प्रेरणादायी उपक्रम सांगलीतील स्वप्नपूर्ती वस्तीस्तरीय संघाने घेतला. विधवा महिलांसोबत सुवासिनी महिलांनी श्रावण महिन्यानिमित्त आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात सहभाग घेतला.
सांगली : सांगलीतून (Sangali) महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारी बातमी… विधवा म्हणून समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या महिलांना सुवासिनींच्या पंगतीला सन्मान देण्याचा प्रेरणादायी उपक्रम सांगलीतील स्वप्नपूर्ती संघाने (Swapnapurti Sangh) घेतला. विधवा महिलांसोबत सुवासिनी महिलांनी श्रावण महिन्यानिमित्त आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमामुळे सांगलीत विधवा प्रथा निर्मूलनाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. मोकळ्या कपाळावर कुंकू लागल्याने विधवा महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. विधवा (Widow Women) हा शब्द महिलांच्या आयुष्यात एकटेपणाची आणि समाजाच्या प्रवाहापासून दूर नेणारा आहे. सुवासिनी असताना अनेक सार्वजनिक कार्यक्रमात महिलांना मानाचे स्थान असते मात्र विधवा महिलेला मात्र या सर्व कार्यक्रमांपासून मुकावे लागते.
समाजाची मानसिकता आणि विधवा महिलांना सामाजिक कार्यक्रमात दिली जाणारी वागणूक यामुळे विधवा महिलांची मानसिकता ही एकलकुंडी बनत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करीत सांगलीतील स्वप्नपूर्ती वस्तीस्तरीय संघाकडून विधवा महिलांच्यासाठी सुवासींनीकडून हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांना सुवासिनी प्रमाणे मान सन्मान देत त्यांच्यासोबत हळदी कुंकू सुद्धा केले. माजी नगरसेविका सरला कांबळे, रेखा कांबळे आणि माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात यांनी या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन केले होते.
पतीच्या दुःखद निधनानंतर कपाळावरचे कुंकू समाजानेच पुसले. त्या दिवसापासून विधवा म्हणून अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आम्हाला दुय्यम वागणूक देत होते मात्र आज आमच्या मोकळ्या कपाळावर कुंकू लागलं आणि आम्हालाही जगण्याची आशा मिळाली अशी भावनिक प्रतिक्रिया सांगलीतील विधवा महिलांनी दिलीय. समाजात ज्यांना विधवा म्हणून त्यांचे हक्क आणि अधिकार डावलले जातात आशा विधवा महिलांना आज सुवासिनीप्रमाणे सन्मान देण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी विधवा म्हणून फिरणाऱ्या महिलांच्या कपाळावर कुंकू लागले आणि त्यांनाही सुवासिनी महिलाप्रमाणे जगण्याची उमेद मिळाली.