Walmik Karad : मोठी बातमी ! वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, तुरूंगातच त्याला… नेमकं काय झालं ?
संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची बीड कारागृहात प्रकृती खालावली आहे. त्याला मूत्राशयाचा संसर्ग (युरोसिस्टायटिस) झाला असून, कारागृहात त्याला सलाईन दिले जात आहे. पुढील उपचारांसाठी त्याला अंबाजोगाई रुग्णालयात हलवले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) हाही गेल्या अनेक महिन्यांपासून तुरूंगाची हवा खात असून आता त्याच्या संदर्भातच मोठी अपडेट उघड झाली आहे. वाल्मिक कराड याला बरं नसून त्याची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड हा गेल्या अनेक महिन्यांपासून बीड (Beed) येथील मध्यवर्ती कारागृहात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याला बरं नसून प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे. त्याला कारगृहातच सलाईन लावून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराड याला लघवीच्या जागी (मूत्राशय) त्रास होत असल्याने उपचार सुरू आहेत. कराड याला ‘युरोसिसटायटीस’ (मूत्राशयाचा संसर्ग) आजार झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.त्याचसंदर्भात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कराडला अंबाजोगाईला हलवणार ?
कराड याला मूत्राशयाच्या जागी त्रास होत असून गेल्या तीन दिवसांपासून कारागृहातच सलाईन लावून त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे. मात्र त्याची प्रकृती खालावली असल्याचे उघड झाले आहे. त्याला मूत्राशयाचा संसर्ग झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने कराडची तपासणी केली आहे. मात्र पुढील उपचारासाठी वाल्मिक कराड याला अंबाजोगाई येथे हलवण्यात येण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र आता थेट परळीच्याजवळ असलेल्या अंबाजोगाई रुग्णालयात त्याला नेलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
काही दिवसांपूर्वी तुरूंगात मारहाण
देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी असलेले वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना काही दिवसांपूर्वी बीडच्या कारागृहात मारहाण झाली होती. या दोघांना महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याची चर्चा होती. या घटनेनंतर कारागृहातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.