भातसा धरणाखालील सावरशेत गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव धुळखात; तिवरेसारखी घटना घडण्याची भीती

| Updated on: Feb 10, 2021 | 1:40 PM

सावरशेतला 2019 पुराचा फटका बसल्यानंतर पुनर्वसन करण्याचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. Sawarshet Villagers Bhatasa river flood

भातसा धरणाखालील सावरशेत गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव धुळखात; तिवरेसारखी घटना घडण्याची भीती
एकनाथ शिंदे यांनी सावरशेत ग्रामस्थांची भेट घेतली होती
Follow us on

ठाणे: भातसा धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या सावरशेत गाव आहे. या गावातील अनेक घरात दरवर्षी पावसाचे व धरणाचे पाणी शिरत असल्याने येथील जनजीवन विस्कळीत होत असते.धरणातून सोडलेल्या पाण्याचा प्रवाह फार जोरात असल्याने येथे दरवर्षी पुर परिस्थिती निर्माण होत असते.त्यामुळे पूर्ण गाव पाण्याने वेढले जात असल्याने काही घरे वाहून जाऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते. सावरशेतला 2019 पुराचा फटका बसल्यानंतर पुनर्वसन करण्याचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, तेव्हापासून पुढे काहीच न झाल्यानं पूरपरिस्थितीबाबत ग्रामस्थ धास्तावलेले आहेत. ( Sawarshet Villagers demanded rehabilitation due to Bhatasa river flood but proposal pending)

2019 मध्ये सावरेशतला पुराचा वेढा

सावरशेतला 2019 मध्ये पुराचा वेढा बसला होता. ज्यावेळी सावरशेतला पुराचा वेढा बसतो त्यावेळी गावाचा संपर्क तुटला जातो. येथील काही रहिवाशी आपला जीव वाचविण्या साठी इतरत्र आसरा घेत असतात. 2019 च्या ऑगस्टच्या महिन्यात गावाभोवती पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं गावाला पुराच्या पाण्यानी वेढले होते. त्यावेळी तात्कालीन आमदार पांडुरंग बरोरा यांनी याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे,माजी आमदार पांडुरंग बरोरा व योगेश पाटील आदी अधिकाऱ्यांसमवेत या गावाला तात्काळ भेट देऊन पाहणी केली होती. या गावाचे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश त्यावेळी दिले होते. परंतु, दोन वर्ष झाले तरी याबाबत कोणतीच हालचाल होत नसल्याने ,सावरशेतचा प्रस्ताव लालफीतीत अडकल्यानं ग्रामस्थांच्या मनात पुराची भीती आहे. यावर्षी पुन्हा भातसा नदीला पूर येऊन गावात पाणी शिरते की काय ? या भीतीने गावकरी आतापासूनच धास्तावलेले आहेत.

2016 पासून पुनर्वसनाची मागणी

पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मत्रिमंडळाची बैठक झाली होती. सावरशेत गावक-यांची पुनर्वसनाची मागणी असल्याची बाब पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली होती. त्यानंतर पाटबंधारे खात्याने या गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव सुद्धा दाखल केला असल्याचे सांगितले होते. मात्र, वर्ष उलटू लागले तरी कार्यवाही होत नसल्याने सावरशेत गावाचा पुनर्वसनाचा प्रस्ताव धूळखात पडला आहे, असं ग्रामस्थांनी सांगितलं आहे.

2016 पासून सावरशेत गावाची पुनर्वसन करण्याची मागणी जलसंधारण व महसूल विभागाकडे येथील रहिवाशांनी केली होती. परंतु, तत्कालीन अधिकाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. सावरशेत गावात 55 घरे असून अंदाजे 350 लोकसंख्या आहे. धरणाच्या खालच्या बाजूस लगतच सावरशेत गाव असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यावर पूर्ण गाव पाण्यात जाते. त्यामुळे या गावाचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटून जीवितहानी होण्याची शक्यता असते, असं माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी म्हटलंय. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले आहे. पांडुरंग बरोरा यांनी सावरशेतचे पुनर्वसन न झाल्यास तिवरे धरणासारखी घटना घडण्याची भीती व्यक्त केली आहे.

“गेल्या दीड वर्षापासून सावरशेत गावाचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव रखडलाय. याही वर्षी गाव पाण्यात जाण्याची भीती असून संपर्क तुटू शकतो. यामुळे शासनाने आमच्या गावाचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे.”असं सावरशेत ग्रामस्थांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या:

Farmers Protest | शेतकरी आंदोलन : संभाव्य तोडगा काय?

औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करा, मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

किरकोळ वादातून तरुणाच्या अंगावर गाडी घालून हत्या, पोलिसांनी तीन तासात आरोपींना ठोकल्या बेड्या

( Sawarshet Villagers demanded rehabilitation due to Bhatasa river flood but proposal pending)