एसटीचं होतंय भलं, गुणवंत कामगारांनाही मिळतंय फळ, ज्येष्ठ प्रवाशांची जादा तिकीट फाडून सरकारला चुना ?

दीर्घकालीन संपानंतर एसटीला खर्चाला कमी पडणारी रक्कम देण्याचे शासनाने हाय कोर्टात मान्य केले होते. त्यानंतर खर्चाला कमी पडणारी रक्कम कधीच देण्यात आलेली नाही. केवळ सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम देण्यात येत आहे.आणि त्यातूनच प्रवासी कराची रक्कम वसुली सुरू आहे. यावर देखील चर्चा झाली पाहिजे.परंतू ती केली जात नाही असेही श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.

एसटीचं होतंय भलं, गुणवंत कामगारांनाही मिळतंय फळ, ज्येष्ठ प्रवाशांची जादा तिकीट फाडून सरकारला चुना ?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Aug 24, 2024 | 5:40 PM

एसटी महामंडळाने एसटीची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी दोन वर्षापूर्वी 75 वर्षावरील अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची योजना आणली होती. यामुळे एसटीतून ज्येष्ठ नागरिकांना आधारकार्ड दाखविले की 75 वर्ष पूर्ण असले की मोफत प्रवास करायला मिळत होता. परंतू काही कंडक्टरनी चांगल्या कामगिरीचे बक्षिस मिळण्यासाठी अमृत महोत्सवी योजनेची जादा तिकीटे फाडून प्रवासी वाढल्याचे दाखविल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेची प्रतिपूर्ती म्हणून जादा अनुदान एसटीला मिळाल्याचे म्हटले जात आहे. यावर एका खाजगी चॅनलने बातमी देखील केली आहे. यावर आता एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे नेते श्रीरंग बरगे यांनी वेगळाच मुद्दा उपस्थित केला आहे.

एसटी महामंडळाने ऑगस्ट 2022 मध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणली होती. यामुळे एसटीचे प्रवासी अचानक वाढले. त्यामुळे सरकारकडून प्रतिपूर्ती म्हणून मोठी रक्कम सरकारकडून मिळू लागली. यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न कधी नव्हे ते वाढू लागले. अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांची तिकीटे फाडून उत्पन्न वाढवावे असे आदेश कुठलाही अधिकारी देऊ शकत नाही असा दावा या संदर्भात एसटीचे वाहतूक महाव्यवस्थापकांनी केला आहे. आगार पातळीवर वा प्रादेशिक पातळीवर अशा सूचना केली असेल आगारांचे उत्पन्न वाढण्याकरीता असा काही प्रकार कंडक्टरांना केलेला असावा, या संदर्भात जालना परतूर आगारातील कंडक्टरची चौकशी सुरु असल्याचे वाहतूक व्यवस्थापकांनी म्हटले आहे. कंडक्टर उत्पन्न वाढवून बक्षिस मिळविण्यासाठी असा प्रकार वैयक्तिक पातळीवर करीत असावेत असेही वाहतूक महाव्यवस्थापकांनी म्हटले आहे.

आधी ही लूट थांबवावी

सन १९८७- ८८ मध्ये एसटी महामंडळ नफ्यात आले त्यामुळे एसटी महामंडळाला ‘इन्कम टॅक्स’ भरावा लागेल आणि तो पैसा केंद्राकडे जाईल म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या अत्यंत अभ्यासू मुख्यमंत्र्यांनी ‘इन्कम टॅक्स’च्या रूपाने जाणारी रक्कम केंद्र सरकारला जाऊ नये आणि ही रक्कम महाराष्ट्र शासनाच्या कामी यायला हवी म्हणून एसटीला प्रवासी उत्पन्नावर १७.५ टक्के इतका प्रवासीकर लावण्याचा निर्णय घेतला.

रक्कम स्वतःसाठी वापरलेली नाही

हा कर लावताना जोपर्यंत एसटी महामंडळ फायद्यात आहे, तोपर्यंतच कर वसूल करण्यात येईल असेही सांगण्यात आले होते. परंतू ही कर आकारणी अद्यापही सुरू आहे. यावर्षी ७८० कोटी रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. ती लूट आधी थांबविण्यावर चर्चा झाली पाहिजे. एसटी महामंडळ हा शासनाचा अंगीकृत उपक्रम असून एसटीच्या कुठल्याही कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक सवलत रक्कम स्वतःसाठी वापरलेली नाही. त्यामुळे विनाकारण सुरू असलेली अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक सवलतीच्या रक्कमेच्या अतिरिक्त वसुलीची चर्चा बंद करण्यात आली पाहिजे असेही बरगे यांनी म्हंटले आहे.

Follow Us